गणपती आड तीन`पत्ती`!

गणपती उत्सव सुरू झाला की सगळीकडेच कसं उत्सवाचं वातावरण असतं. दहा दिवस सगळेच भक्तीच्या रसात रंगतात. मात्र या उत्सवाच्या काळात आणखी एक जमात फॉर्मात येते आणि ती म्हणजे जुगा-यांची.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 19, 2013, 12:18 AM IST

अजित चव्हाण, www.24taas.com, मुंबई
गणपती उत्सव सुरू झाला की सगळीकडेच कसं उत्सवाचं वातावरण असतं. दहा दिवस सगळेच भक्तीच्या रसात रंगतात. मात्र या उत्सवाच्या काळात आणखी एक जमात फॉर्मात येते आणि ती म्हणजे जुगा-यांची. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, मात्र गणेशोत्सवात सुरू होणारी `नाल` म्हणजेच तीनपत्ती, अंदर-बाहर, रम्मी अशा पत्त्यांच्या या जुगारावर पुढचे दोन-तीन-चार महिने कोट्यवधींची उलाढाल होते. जुगारी, कार्यकर्ते, नेते, पोलीस, हरकामे, दलाल, जॉकी (व्यावसायिक जुगारी ) काही ठिकाणी यांना खेळी म्हणतात, ते मालामाल होतात. तर अनेक कुटूंब याच काळात अक्षरशः उध्वस्त होतात. पूर्वीच्या काळी गणेशोत्सवाला विधायक स्वरूप होतं. कार्यकर्ते काटकसरीने उत्सव साजरा करतं.
अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत. या उत्सवात अनेक पिढ्यांवर संस्कार झाले, अनेक चांगले कार्यकर्ते घडले, आम्हीही याच उत्सवातून वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवलं. याच उत्सवानं आम्हाला घडवलं. अनेक मंडळांनी ही परंपरा जपली असली तरी तितकीच मोठी संख्या या मंडळांत जुगा-यांची आहे. अनेक जुगारी या काळात तयार होतात. त्यांच्या या गोरखधंद्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल या काळात चालते. हे थांबणं आता केवळ अशक्य आहे. कारण समाजासमोर उत्सवाचं हे काळं चित्र येतच नाही. गणपतीचं आगमन होताच मोठ मोठे क्लब चालवणा-या माफियांची लगबग सुरू होते. पूर्वी गणपतीच्या मांडवातच हे जुगार रात्री उशीरापर्यंत चालत. काही ठिकाणी तर मोठे स्टेज आणि त्याखाली जुगाराचे डाव रंगत. पण माध्यमातून येणा-या बातम्यांमुळं दबाव वाढला आणि हा धंदा मांडवात बंद झाला. आता हे मार्केट मांडवाच्या माघारी अत्यंत नियोजनबध्दरीत्या चालवलं जातं. गणपतीचे दिवस जवळ आले की मोठमोठ्या नेत्यांची मंडळं आपला भाव सांगतात. क्लब चालवणारे प्रोफेशनल त्यांची `नाल` म्हणजेच जुगाराचे अड्डे भाड्याने चालवायला देतात. ही रक्कम ५ लाखांपासून कोटीपर्यंत असते. मंडळाकडे ही रक्कम जमा केली जाते. यात पोलिसांचा हप्ताही ठरलेला असतोच. गणेशोत्सवात सुरू झालेले हे जुगाराचे अड्डे दोन ते तीन महिने चालतात. गणपतीच्या मंडपापासून जवळच कुठेतरी एखादा मोठा फ्लॅट, गोडाऊन किंवा मोठी जागा पाहून जुगाराचा हा डाव रंगतो. मोठं मंडळ असेल तर हा सरंजाम अगदी एसी असतो आणि सगळी `सोय` याच ठिकाणी असते. अट्टल जुगा-यांना निरोप जातात. वर्षानुवर्षे ठरलेलं असल्यानं अनेकांना तर निरोपाची गरजही भासत नाही. गावा-गावातून चांगले खेळी बोलावले जातात. त्यांचा तर कमावण्याचा सिझनच असतो. एखाद्याला जुगारात पैसे लावायचे असतात मात्र प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नसतो. त्यांच्यासाठी हे खेळी जुगार खेळतात. अनुभवाच्या जोरावर जास्तीत जास्त पैसे जिंकून देतो.
मात्र नंतर तो आपल्या मालकाचं उखळ पांढरं करून द्यायलाही कमी करत नाही हे वेगळं सांगायला नको. या निमित्तानं जमिनीचे पैसे खिशात खुळखुळणा-या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज़मधून फिरणा-या गावोगावच्या शेठ लोकांना मोठा विरंगुळा मिळतो. दोन नंबरच्या धंद्यात हाताखाली काम करणारे, वेळ आल्यावर केसेस अंगावर घेणारे, पोलिसांचा मार खावूनही न कबुलणारे, दुस-यांच्या केसेस अंगावर घेणा-यांना तुलनेन सुरक्षित आणि चांगली आर्थिक प्राप्ती करून देणारा हा काळ असतो. हे अड्डे चालवणारे गँम्बलर शेठ लोक हे वरपर्यंत पोहच असणारे आणि राजकीय वर्तुळात चांगलीच उठबस असणारे असल्यानं वर्दीवाल्यांचा फारसा धाक नसतोच. शिवाय असे अड्डे ज्या मंडळांच्या नावाखाली चालवले जातात, ती मंडळं बहुतांश वजनदार राजकीय नेत्यांची कार्यकर्त्यांची असल्यानं सगळी सेंटींग फुलटू असते. चोरीचा मामला हळूहळू बोंबला असं सगळं असल्यानं पोलिस चोख हप्ता वाजवुन घेतात. शिवाय कायदा सुव्यवस्थेचं टेंशन नसतंच. कारण भाईच्या मंडळात राडा करायला चांगल्या-चांगल्यांची फाटत असल्यानं सिनियर सायबाला ( वरिष्ठ पोलिस निरिक्षक) तस टेंशन नसतंच. शिपायापासुन सिनियर सायबापर्यंत सगळ्यांनाच पाहिजे ते पुरवलं जातं. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया म्हणत खो-यान पैसा ओढला जातो. दरवर्षी या सगळ्या वर्तुळाच कुणाची नाल कितीला गेली, याची जोरदार चर्चा असते. शिवाय मोठ-मोठे शेठ, बिल्डर, गुंड, राजकीय नेते यांच्या अनेक दिवसातुन भेटीगाठी होतात. टेबलावर खेळता खेळता मोठमोठे व्यवहार ठरतात. ही सगळी हाय प्रोफाईल मंडळी पाच दहा लाख सहज खेळून मोकळी होतात. खेळायला बसल्यावर किंमती स्कॉचच्या बाटल्या, फायफायफायची पाकिट टेंशनमध्ये रिकामी होतात. एखाद्या भिडूला मोठी ढाय (मोठ्या रकमेचा जँकपॉट) लागली की हरकाम्या पो-यांचे डोळे चमकतात आण