माजी राष्ट्रपती 'मिसाईल'मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते.  

ANI | Updated: Jul 27, 2015, 10:26 PM IST
माजी राष्ट्रपती 'मिसाईल'मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन title=

UPDATE रात्री १०.०१ वाजता -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्व कायम लक्षात राहिल. कलाम हे मार्गदर्शक होते. 

UPDATE रात्री १०.०० वाजता -

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर रामेश्वर या जन्मगावी अंत्यसंस्कार होणार...

UPDATE रात्री ९.३० वाजता -

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, केंद्रीय गृहखात्यानं जाहीर केला राष्ट्रीय दखवटा

शिलाँग: भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते. शिलाँग इथं आयआयएमच्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान ते मंचावरच कोसळले, त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या धक्क्यानं संध्याकाळी सातवाजून ५४ मिनीटांनी त्यांचं निधन झालं. 

अब्दुल कलाम यांचा अल्प परिचय -

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडूत झाला. 

२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ दरम्यान हे भारताचे अकरावे राष्ट्रपती कार्यकाळ 
होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

 

कलाम यांचं अखेरचं ट्विट- 

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत होते. डॉ. कलाम यांनी आपलं शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केलं. लहान वयातच वडिलांचं छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रं विकून, तसंच अन्य लहान मोठी कामं करून पैसे कमवीत आणि घरी मदत करीत. त्यांचं बालपण खूप कष्टात गेलं. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली इथं सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झालं. तिथं बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतलं.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी(DRDO)संबंध आला.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल)च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतानं क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रं तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा आणि लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनानं खूप संवेदनशील आणि साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' आणि १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित होते आणि पूर्ण शाकाहारी होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.

देशातील सर्वोच्च सन्मान -

भारत सरकारनं 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.