)
Kojagiri Purnima 2025 : दसऱ्यानंतर आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वर्षात येणाऱ्या प्रत्येक 12 पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. शरद पौर्णिमेला चंद्राला खास महत्त्व असून यादिशी चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आहे. अनेक लोक पौर्णिमेचा उपवास करतात. हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला तिथीला विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना करण्यात येते. त्यासोबतच यादिवशी चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे.
असं मानलं जातं की, शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो. असं म्हणतात की, या दिवशी चंद्राच्या किरणांमधून जणू अमृत पृथ्वीवर पडतं. हा दिवस आणखी विशेष आहे कारण देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर येत असते. या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळती अशी मान्यता आहे.
हिंदू पंचागानुसार, आश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, 6 ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून, या वर्षीचा शरद पौर्णिमा उत्सव 6 ऑक्टोबर रोजी साजरी करायची आहे. चंद्राच्या अमृत वर्षावात मसाला दूध, खीर करण्याची प्रथा असून 6 ऑक्टोबरची राज जागरण करायचं असतं.
पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करा. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या दोन पानांवर सुपारी ठेवा. तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा ठेवा. त्यात आंब्याचा डगळा हे इंद्राचे प्रतिक म्हणून ठेवा. तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करुन ठेवा. रात्री 12 ते 12.30 या 30 मिनिटात दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवा. जेणे करुन चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
त्यानंतर 12.30 ला पूजेच्या पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुलं, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करा.
शरद पौर्णिमा हा धार्मिक सण तसंच शेकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पिक कापणीचा उत्सव देखील आहे. हा सण पावसाळा ऋतुचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवितो. या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना देखील केली जाते. मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सर्व 16 कलांनी संपन्न होत उदयास येतो. या दिवशी खीर बनवून ती रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. मान्यतेनुसार, असे केल्याने खीरमध्ये अमृताचे गुण येतात. वैज्ञानिकदृष्ट्या देखील याला महत्त्व असून शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे खीरमधील पोषक तत्त्वांमध्ये वाढ होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)