)
Asia Cup 2025 Trophy Mohsin Naqvi Controversy: आशिया कप 2025 हा काही दिवसांपूर्वी संपला. पण याची चर्चा अजूनही थांबलेले नाहीत. मैदानावर भारताने पाकिस्तानला हरवून किताब पटकावला, पण खरी लढाई आता ट्रॉफीभोवती रंगत आहे. हा वाद फक्त क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित न राहता थेट कूटनीतिक आणि राजकीय पातळीवर झळकताना दिसतोय.
टूर्नामेंटदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्तणुकीवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कधी 6-0 चे हावभाव, कधी भारतीय वायुसेनेवर तिरकस टिप्पणी, तर कधी अशिष्ट भाषेचा वापर. आता ट्रॉफीशी संबंधित घडामोडींनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषक आमिर हुसेन यांनी दावा केला आहे की एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी स्वतः भारतीय ड्रेसिंगरूममध्ये ट्रॉफी देण्यासाठी पोहोचले होते. हुसेन यांच्या मते, भारतीय संघाने स्टेजवर ट्रॉफी घेण्यासाठी येण्यास नकार दिल्याने नकवी जवळपास 20 मिनिटे मंचावर थांबले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा आणि प्रशिक्षक माइक हेसन यांच्यासह भारतीय ड्रेसिंगरूमकडे मोर्चा वळवला, जिथे सूर्यकुमार यादवशी त्यांची चर्चा झाली. मात्र, ट्रॉफी हस्तांतरणाची औपचारिकता पार पडली नाही.
सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा उघड झाले की किताब भारताला दिल्याशिवाय ट्रॉफी पाकिस्तानमध्ये परत नेण्यात आली. हुसेन यांनीही हे मान्य केले की हा निर्णय चुकीचा होता आणि त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यांनी म्हटले, “ACC चे अध्यक्ष नकवी आहेत, म्हणून ट्रॉफी त्यांच्याकडून मिळणे अपेक्षित होते. जर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह असते तरी आम्ही स्वीकारले असते. भारताची नाराजी फक्त यासाठी आहे की नकवी पाकिस्तानी आहेत.”
हुसेन पुढे म्हणाले, “भारताने ट्रॉफी न घेणे आणि पाकिस्तानने ती परत नेणे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. किताब भारताने जिंकला, याबद्दल कोणताही वाद नाही. मग ACC अध्यक्षांकडून घेण्यात काय हरकत होती?”
नक्वी भारतीय ड्रेसिंगरूमकडे जात असताना काही पाकिस्तानी स्टाफ आणि समर्थकांनीही त्यांना थांबवले होते. “तिकडे जाऊ नकात, जर ते घेत नसतील तर ट्रॉफी घेऊन परत या.” अशा प्रतिक्रिया उमटल्या. तरीही नकवी म्हणाले, “माझं कर्तव्य आहे त्यांना समजावणं.” मात्र सूर्यकुमारशी चर्चा करूनही तोडगा निघाला नाही.
हा वाद केवळ एका कपाचा नाही. हा भारत-पाकिस्तानमधील वाढत्या अविश्वासाचा, खेळामध्ये मिसळलेल्या राजकीय छटांचा आणि कूटनीतीच्या गुंतागुंतीचा परावर्तक आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत किताब जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी न मिळता आयोजक देश परत घेऊन गेला, ही पहिलीच वेळ आहे आणि तो संघ भारत असताना या घटनेने अधिकच खळबळ उडवली आहे.