India vs Bangladesh 2nd Test Match Kanpur Pitch Report : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून यातील दुसरा सामना शुक्रवार 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे पार पडेल. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 280 धावांनी सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यापूर्वी कानपुर स्टेडियमची हालत खराब असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 5 दिवसांची टेस्ट सीरिज खेळवली जाईल. मात्र यासाठी कानपुर स्टेडियमवर तयारी पूर्ण झालेली नाही. स्टेडियममधील प्रेक्षकांचा स्टॅन्ड खराब असून फ्लडलाइट्स सुद्धा ठीक काम करत नाहीत. 3 वर्षांपूर्वी याच स्टेडियमवर टीम इंडियाचा सामना पार पडला होता, त्यावेळी खराब फ्लडलाइट्समुळे भारत विजयापासून केवळ एक विकेट दूर राहिला होता. 


‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने ग्रीनपार्क स्टेडियमवरील तयारींशी निगडित एक स्टोरी पब्लिश केली असून तेथील स्टॅन्डची हालत चिंताजनक आहे. स्टेडियमवरील एक स्टॅन्ड खराब स्थितीत असून पीडब्ल्यूडीने स्टॅन्डच्या बाल्कनी विषयी चिंता व्यक्त केलीये, त्यांच्या रिपोर्टनुसार हा स्टॅन्ड निर्धारित क्षमतेच्या बरोबर वजन पेलू शकत नाही. म्हणून बाल्कनीच्या अर्ध्याच तिकिटांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू बनणार KKR चा नवा कर्णधार? कोलकाताकडून मोठी ऑफर, श्रेयस अय्यरला झटका


 यूपीसीएचे सीईओ अंकित चटर्जी यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या स्टॅन्डची प्रेक्षक क्षमता ही 4800 इतकी आहे, परंतु हा स्टॅन्ड चांगल्या स्थितीत नसल्याने केवळ 1700 सीट्सच्या तिकिटांचीच विक्री केली जाईल. पीडब्ल्यूडीच्या इंजीनियरने सांगितल्याप्रमाणे, 'जर लोक ऋषभ पंतच्या षटकारावर उड्या मारायला किंवा नाचू लागले तर ते 50 प्रेक्षकांचे वजनही सहन करू शकणार नाहीत. इतकी या बाल्कनीची बिकट अवस्था आहे. 'कानपुर स्टेडियमवरील स्टॅन्डच नाही तर फ्लडलाइट्स सुद्धा खराब स्थितीत आहेत. व्हीआयपी पॅव्हेलियन जवळ असलेल्या फ्लड लाईट्सचे जवळपास ८ ब्लड खराब आहेत. त्यामुळे जर सामन्यादरम्यान लाईट्स लावण्याची गरज भासली तर त्या आवश्यक इतका प्रकाश देऊ शकणार नाहीत. 


काही दिवसांपूर्वीच ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सामना खेळवला जाणार होता. मात्र येथे थोडा पाऊस पडल्याने मैदानात पाणी साचले होते. मैदानाची ड्रेनेज सिस्टम चांगली नसल्याने पाणी लवकर सुकले नाही. पाऊस थांबल्यावर मैदान सुकवण्यासाठी ५ दिवस विविध प्रकारे प्रयत्न सुरु होते. परंतु शेवटी मैदानात ओलच राहिल्याने हा सामना एकही बॉल न खेळता रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेट बॉर्डरच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.