टीम इंडियाकडे सीरिज बरोबरीत आणण्याची संधी, भारताला विजयासाठी बनवाव्या लागतील 'इतक्या' धावा

IND VS ENG Test : शनिवारी दुसऱ्या टेस्ट सामन्याचा चौथा दिवस आहे. तेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये भारत फलंदाजी करत असताना त्यांना इंग्लंडला विजयासाठी आव्हान देण्याकरता जास्तीत जास्त धावा करणं महत्वाचं असणार आहे. 

पूजा पवार | Updated: Jul 5, 2025, 03:53 PM IST
टीम इंडियाकडे सीरिज बरोबरीत आणण्याची संधी, भारताला विजयासाठी बनवाव्या लागतील 'इतक्या' धावा
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज  खेळवली जात असून यातील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली आहे. एजबेस्टन टेस्टमध्ये भारताची स्थिती मजबूत दिसतेय. यात भारताने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात 269 धावांची कामगिरी केली, ज्यामुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये 587धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने 6 आणि आकाश दीपने 4 विकेट घेऊन इंग्लंडला 407 धावांवर ऑलआउट केले, ज्यामुळे भारताकडे दुसऱ्या इनिंगच्या फलंदाजीपूर्वी 180 धावांची आघाडी शिल्लक आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तिसऱ्या दिवसाच्या अंती भारताने फलंदाजी करताना 1 विकेट गमावून 64 धावा केल्या. म्हणजेच आता भारताची आघाडी 244 धावा इतकी आहे. सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की, इंग्लंड विरुद्ध किती धावांचं लक्ष ठेवल्यास भारताला विजयाची गॅरेंटी मिळू शकेल. इंग्लंडने पहिल्या टेस्टमध्ये कठीण वाटणारं 371 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. त्यामुळे इंग्लंडला नेमकं किती धावांचं आव्हान द्यावं जेणेकरून ते त्यांना पूर्ण करता येणार नाही याचा विचार अनेकजण करत आहेत. 

इंग्लंड समोर किती धावांचे आव्हान ठेवायला हवं : 

टीम इंडिया बर्मिंघम टेस्टमध्ये चौथ्या दिवशी 244 धावांच्या आघाडीने पुन्हा फलंदाजी करायला उतरेल. तिसऱ्या दिवसाच्या अंती भारताने फलंदाजी करताना १ विकेट गमावून 64 धावा केल्या. तेव्हा क्रीजवर करुण नायर आणि केएल राहुल यांची जोडी होती. भारतासाठी पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक करणारा शुभमन गिल सुद्धा अजून फलंदाजीसाठी मैदानात यायचाय. तर ऋषभ पंत सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे. तेव्हा टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्ये 500 हून अधिक धावांची आघाडी घ्यायला हवी. 

एका सेशनमध्ये ठोकल्या 172 धावा : 

पहिल्या इनिंगमध्ये 84 धावा करून 5 विकेट पडल्यावरही हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने 303 धावांची पार्टनरशिप केली आणि संघाची धावसंख्या 400 धावा पार पोहोचवली. एका सेशनमध्ये इंग्लंडने 172 धावा केल्या होत्या. तेव्हा भारताला इंग्लंडला विजयासाठी कमीत कमी 550 धावांचं टार्गेट द्यावं लागेल. बर्मिंघमच्या मैदानात भारताने 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट सामन्यात 378 धावांची कामगिरी केली होती. हा टेस्ट सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना या संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. हॅरी ब्रूकने आधीच सांगितले आहे की भारत त्यांना जे काही लक्ष्य देईल ते साध्य करण्यास ते सक्षम आहेत. त्यामुळे भारतासाठी दुसरा टेस्ट सामना सुद्धा नक्कीच आव्हानात्मक असेल. 

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More