IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे

Arshdeep Singh : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला. 

पूजा पवार | Updated: Jan 22, 2025, 08:22 PM IST
IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला. अर्शदीपने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाज युजवेंद्र चहलचा रेकॉर्ड मोडला. त्यामुळे आता 25 वर्षांचा अर्शदिप सिंह (Arshdeep Singh) हा टी20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्याचा टॉस जिंकून कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर इंग्लंडला फलंदाजीसाठी आव्हान दिले.  सामना सुरु होताच अर्शदीपने इंग्लंडचे फलंदाज फिलिप सॉल्ट आणि बेन डिकेट यांना बाद केले. यामुळे फिलिप सॉल्टला एकही धाव करता आली नाही तर बेन डिकेट अवघ्या 4 धावा करून माघारी परतला. 

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नावावर होता. चहलला ही कामगिरी करण्यासाठी 7 वर्ष लागली होती. त्याने 2016 पासून 2023 पर्यंत 80 टी20 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतले. परंतु अर्शदीप सिंह  2022 ते 2025 या अवघ्या काही वर्षात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने हा कारनामा त्याचा  61 वा टी 20 सामना खेळताना केला आहे. 

T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज : 

97 - अर्शदीप सिंह (61 सामने)
96 - युजवेंद्र चहल (80 सामने)
90 - भुवनेश्वर कुमार (87 सामने)
89 - जसप्रीत बुमरा (70 सामने)
89 - हार्दिक पंड्या (110 सामने)

भारतीय संघ : 

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

About the Author