IPL 2025 CSK Beat MI Suryakumar Yadav Reacts: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील तिसऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबई इंडियन्सचा पर्वातील पहिल्याच सामन्यात पराभव झाला. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने घरच्या मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईच्या संघाला चार विकेट्स आणि पाच चेंडू राखून धूळ चारली. या सामन्यामध्ये गोलंदाजीपासून ते फलंदाजीपर्यंत सर्वचबाबतीत चेन्नईचा संघ वरचढ राहिला. मात्र या सामन्यानंतर मुंबईच्या संघाने हा सामना गमावला म्हणजे यंदा सुद्धा आयपीएलचा चषक मुंबईच जिंकणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे. मागील काही वर्षांपासूनच इतिहास पाहता 'पहिली मॅच देवाला' म्हणत आता मुंबई उत्तम खेळणार असं मुंबईचे चाहते म्हणत आहेत. विशेष म्हणजे या विचित्र योगायोगाबद्दल पहिल्या सामन्यानंतर स्वत: सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
चेन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भोपळाही न फोडता सामन्याच्या चौथ्या चेंडूवर रोहित तंबूत परतला. तिसऱ्या ओव्हरला रेकेल्टन बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने मुंबईच्या विकेट्स पडत राहिला आणि मुंबईचा संघ कसाबसा 150 च्या पुढे पोहोचला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 156 धावांचा पाठलाग करताना पाच चेंडू शिल्लक असतानाच सहा विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य काढलं. रचिन रविंद्रने षटकार लगावत चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील मुंबईविरुद्धचा सलग चौथा विजय ठरला.
या सामन्यानंतर माजी प्रशिक्षक आणि सध्या कॉमेंट्री बॉक्समधून समालोचन करणाऱ्या रवी शास्त्रींनी सूर्यकुमार यादवबरोबर सामन्याविषयी चर्चा केली. त्यावेळी सूर्यकुमारने आम्ही 20 ते 25 धावा कमी केल्या असं मला वाटत असल्याचं सांगितलं. त्याने या सामन्यात उत्तम फलंदाजी करणारा चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचं कौतुकही केलं. यानंतर रवी शास्रींनी मुंबईने पहिला सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ नसून सातत्याने मागील 13 वर्षांपासून हे असं होत असल्याची आठवण सूर्याला करुन दिली. यावर सूर्याने भन्नाट रिप्लाय दिला.
"2012 पासून मुंबई इंडियन्सला कधीच पहिला सामना जिंकता आलेला नाही. मात्र 2012 पासून आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. म्हणजे यंदाही तुम्ही जिंकणार?" असा सवाल रवी शास्रींनी विचारला. हा प्रश्न ऐकताच सूर्याने हसतच, "ही स्पर्धा फार काळ चालणार आहे. आम्ही पुढे नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. हे पर्व खरोखरच छान असेल असं मला वाटतंय," असं सूचक विधान केलं.
मुंबईच्या संघाने 2013, 2015, 2017, 2019, 2020 साली आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.