IPL 2025: राहुल द्रविड आणि संजू सॅमसनमध्ये वाद; बोलत असतानाही केलं दुर्लक्ष; VIDEO त कैद झाला दोघांमधील अबोला

IPL 2025: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे तर राहुल द्रविड प्रशिक्षक आहे.  

शिवराज यादव | Updated: Apr 18, 2025, 03:41 PM IST
IPL 2025: राहुल द्रविड आणि संजू सॅमसनमध्ये वाद; बोलत असतानाही केलं दुर्लक्ष; VIDEO त कैद झाला दोघांमधील अबोला

IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2025 च्या सामन्यात फक्त 19 चेंडूत 31 धावा केल्यानंतर संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे बाहेर बसावं लागलं. राजस्थानसमोर 188 धावांचं आव्हान असताना हा सामना ड्रॉ झाला. मात्र दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये, राजस्थानने फॉर्ममध्ये असलेल्या नितीश राणाला वगळलं आणि त्याऐवजी यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग यांना पाठवलं.

यादरम्यान आता, सोशल मीडिया युजरने पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, राजस्थान रॉयल्सचं वरिष्ठ संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, साईराज बाहुतुले यांच्यासह सुपर ओव्हरच्या आधी चर्चा करत आहे. त्याच व्हिडिओमध्ये सॅमसनही दिसत आहे. मात्र तो चर्चेत सहभागी न होता अवतीभोवती फिरताना दिसत आहे. संजू तणावात किंवा आपल्या विचारांमध्ये मग्न असल्याचं असू शकतं. पण अनेक नेटकऱ्यांनी संघात काही फूट आहे का? अशी संका व्यक्त केली आहे. चर्चेदरम्यान एक खेळाडू सॅमसनला काहीतरी बोलताना दिसत आहे, पण तो इशारा करत निघून जातो.

बुधवारी रात्री अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2025 मधील पहिल्या सुपर ओव्हरसाठी नितीश राणा राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांपैकी एक असेल अशी अपेक्षा होती. पण 28 चेंडूत 51 धावा करूनही, राणाला न पाठवण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याऐवजी शिमरॉन हेटमायर, रियान पराग आणि नंतर यशस्वी जैस्वाल यांना प्राधान्य देण्यात आलं. पण राजस्थानची ही रणनिती अपयशी ठरली. राजस्थान संघ 5 चेंडूत फक्त 11 धावा करु शकला ज्यामध्ये दोन रन आऊट होते. 

नाट्यमय सामन्याच्या समारोपावेळी राणा म्हणाला की, मैदानावरील सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाच्या हातात आहेत. “हा कधीच एका व्यक्तीचा निर्णय नसतो. हा नेहमीच व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफ  यांचा असतो. कारण ते या गोष्टींवर चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. मला असे वाटते की जर हा निकाल आमच्या बाजूने लागला असता, तर प्रश्न वेगळा असता. त्यामुळे क्रिकेटचा हा खेळ निकालावर आधारित आहे.," असं त्याने म्हटलं. 

"व्यवस्थापन हे ठरवते. दोन वरिष्ठ खेळाडू आणि कर्णधार आहेत. मला वाटते, तो निर्णय योग्य होता. हेटमायरने दोन षटकार मारले असते तर तुम्ही हाच प्रश्न विचारला नसता. हेटमायर हा आमचा फिनिशर आहे. सगळ्यांना हे माहीत आहे आणि त्याने भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आम्ही आणखी लक्ष केंद्रीत करु शकतो," असं मत त्याने मांडलं.