'माझ्या संघाला मी...'; Impact Player म्हणून बाहेर बसावं लागत असल्याने रोहित नाराज?

IPL 2025 Rohit Sharma On Impact Player: रोहितने चेन्नईविरुद्धच्या सामनात 76 धावा केल्या तर हैदराबादविरुद्धही 70 धावांची खेळी केली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 24, 2025, 11:31 AM IST
'माझ्या संघाला मी...'; Impact Player म्हणून बाहेर बसावं लागत असल्याने रोहित नाराज?
रोहित अगदी स्पष्टच याबद्दल बोलला

IPL 2025 Rohit Sharma On Impact Player: मुंबई इंडियन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरूद्धचा बुधवारी झालेला सामना मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. मात्र या पर्वामध्ये रोहित शर्माला अनेकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानातून बाहेर बसवण्यात आलं किंवा एकाच इनिंगमध्ये खेळवण्यात आलं. आता याचसंदर्भात रोहितने आपलं मन मोकळं केलं आहे.

इम्पॅक्ट प्लेअर रोहितला पटत नाही

सध्या रोहित शर्मा हा केवळ फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात खेळत आहे. अर्थात तो हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून निर्णय घेताना मदत करताना दिसतो. मात्र रोहितची प्रमुख जबाबदारी ही सलामीवीर म्हणून खेळण्याची आहे. त्यामुळेच त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरलं जातंय. याबद्दल विचारलं असता रोहितने आपल्याला 2025 च्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्यास कोणतीही अडचण वाटत नसल्याचं सांगितलं. मुंबईच्या संघाने केवळ फलंदाज म्हणून रोहितला वापरण्याची भूमिका घेतल्याचं अनेक सामन्यांमध्ये दिसून आलं आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला रोहित काही सामने खेळलाही नव्हता. खरं तर रोहितला इम्पॅक्ट प्लेअर ही संकल्पना फारशी रुचत नाही. या गोष्टी क्रिकेटमध्ये असाव्यात का याबद्दल रोहितचं मत फारसं चांगलं नाही.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याबद्दल रोहित काय म्हणाला?

"याबद्दल मी आधीही बोललो आहे. 2-3 ओव्हरने सामन्यावर मोठा फरक पडत नाही. तुम्ही पहिले 17 ओव्हर फिल्डींग केली नसेल आणि अचानक तुम्हाला बोलवण्यात आलं तर सामन्याशी जुळवून घेणं कठीण जातं. मात्र माझ्या संघाला मी केवळ फलंदाजी करावी असं वाटत असेल तर मला काहीही हरकत नाही," असं रोहितने म्हटलं आहे. रोहितने चेन्नईविरुद्धच्या सामनात 76 धावा केल्यानंतर हे विधान केलं. रोहितने कालच झालेल्या सामन्यात हैदराबादविरुद्धही 70 धावांची खेळी केली. 

सलग दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी

सनरायझर्सविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने 7 विकेट्स आणि 26 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. सनरायझर्सच्या संघाची अडखळती सुरुवात झाली. त्यांना आपल्या निश्चित 20 ओव्हरमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ 143 धावा करता आल्या. मुंबईच्या संघाने या धावांचा अवघ्या 15.4 ओव्हरमध्ये यशस्वी पाठलाग केला. मुंबईकडून रोहित शर्माने 46 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या. रोहितने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. रोहितबरोबरच कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद राहत उत्तम फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या.