IPL 2025 मध्ये सुरु आहे Match Fixing? मुद्दाम एकामागोमाग एक सामने हारतोय 'हा' संघ?

IPL 2025 Shocking Match Fixing Claim: इंडियन प्रिमिअर लीगचं यंदाचं पर्व अर्ध्यात आलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 22, 2025, 11:25 AM IST
IPL 2025 मध्ये सुरु आहे Match Fixing? मुद्दाम एकामागोमाग एक सामने हारतोय 'हा' संघ?
आरोप झालेल्या संघाशीसंबंधित अधिकाऱ्याचाच खळबळजनक दावा (फाइल फोटो)

IPL 2025 Shocking Match Fixing Claim: राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल 2025 मधील त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकता जिंकता पराभूत झाले. राजस्थानचा संघ सामना जिंकेल असं वाटत असतानाच अचानक खेळ फिरला आणि राजस्थानने लागोपाठ दोन सामने गमावले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये तर राजस्थानच्या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्यांनी सामना गमावला. त्यापूर्वी त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाविरूद्धचा सामना गमावला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना 9 धावा काढता आल्या नाहीत. 

पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी

राजस्थानच्या संघाची यंदाच्या पर्वातील कामगिरी सुमारच राहिली आहे. मागील पर्वांमध्ये उत्तम कामगिरी करणारा मूळ संघ आहे तसाच ठेवलेला असतानाही संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या संघाने यंदा गोंधळ घालून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सात सामन्यामध्ये पाच पराभव आणि दोन विजयांसहीत संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दहापैकी आठव्या स्थानी आहे.

सामना फिक्स होता?

राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) समितीचे संयोजक जयदीप भिहानी यांनी राजस्थानच्या संघाच्या कामगिरीबद्दल शंका उपस्थित केली आहे. खास करुन लखनऊविरुद्धच्या सामन्यामधील कामगिरीवर भिहानी यांना काहीतरी विचित्र वाटत असल्याचं नमूद केलं आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावता? असा सवाल भिहानींनी विचारला आहे. ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल, असं भिहानी म्हणालेत.

लखनऊविरुद्धच्या सामन्यात नेमकं घडलं काय?

181 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जयसवालने 74 तर वैभव सूर्यवंशीने 34 धावा केल्या. दोघांनी 8.4 ओव्हरमध्येच संघाला 84 धावांपर्यंत पोहचवलं. सूर्यवंशी बाद झाल्यानंतरही राजस्थान सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये राजस्थानला विजयासाठी 25 धावांची गरज होती. संघाच्या हातात 8 विकेट्स होत्या. अशा स्थितीमध्ये 10 पैकी 9 संघ नक्कीच विजयी होतात. मात्र आवेश खानच्या गोलंजीपुढे राजस्थानच्या संघाने नांगी टाकली. आवेशने जयसवाल आणि रियान पराग यांना अवघ्या पाच धावा देत तंबूत परत पाठवलं. हा सामना लखनऊने 2 धावांनी जिंकला. 

यापूर्वीही राजस्थानवर घालण्यात आलेली बंदी

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांवर आयपीएलच्या शिस्त पालन समितीने 2 वर्षांची बंदी घातली होती.