MI VS RR : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये कोणते बदल होणार?

IPL 2026 MI VS RR : मंगळवार 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणारा सामना हा पावसामुळे रद्द होण्याच्या मार्गावर आहे. गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये कोणते बदल होणार? जाणून घ्या.   

पूजा पवार | Updated: Apr 7, 2026, 09:02 PM IST
MI VS RR : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये कोणते बदल होणार?
Photo Credit - Social Media

IPL 2026 MI VS RR : आयपीएल 2026 चा 13 वा सामना मंगळवार 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर होणार असून पावसामुळे टॉस व्हायला उशीर होतोय. यापूर्वी सोमवारी 6 एप्रिल रोजी झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला. आता मुंबई विरुद्ध राजस्थान सामना सुद्धा पावसामुळे रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जर खराब हवामानामुळे हा सामना होऊ शकत नसेल तर लीग स्टेज सामन्यांकरता कोणते नियम आहेत? तसेच याचा पॉईंट्स टेबलमध्ये कसा परिणाम होणार याविषयी जाणून घेऊयात. 

रिजर्व्ह डे च्या दिवशी होणार सामना? 

आयपीएलच्या लीग स्टेज सामन्यात कोणताही रिजर्व्ह डे चा नियम नाहीये. जेव्हा कोणत्याही लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये पावसामुळे व्यत्यय येतो तेव्हा त्याच दिवशी प्रत्येकी पाच - पाच ओव्हरचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा कधी लीग स्टेज सामना पावसामुळे रद्द होतो तेव्हा त्याहिशोबाने ओव्हर्समध्ये कपात होते आणि शेवटी पाच पाच ओव्हरच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केला जातो. जर पाच पाच ओव्हरचे सामने खेळवण्यात शक्य झालं नाही तर तो सामना रद्द केला जातो. कारण त्या सामन्यासाठी कोणताही रिजर्व्ह डे नसतो. 

हेही वाचा : David Warner : ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला अटक, कारण ऐकून फॅन्स नाराज

पॉईंट्स टेबलमध्ये कसा होणार बदल? 

आयपीएल 2026 च्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर मुंबई इंडियन्स सध्या सहाव्या स्थानावर आहे. ज्यात त्याने दोन सामन्यात एक विजय मिळवला. दुसऱ्या ठिकाणी रियान परागच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. दोन्ही सामने जिंकली. राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक पॉईंट्स मिळेल. दोघांच्या नेट रन रेटवर याचा परिणाम होणार नाही. मात्र पॉईंट्स टेबलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स 2 पॉइंट्सने नंबर सहावर आहे तर हैदराबाद संघाकडे सुद्धा 2 पॉईंट्स असून त्यांचा नेट रन रेट हा मुंबईपेक्षा चांगला असल्याने ते नंबर 5 वर आहेत. मात्र जर मुंबई विरुद्ध राजस्थान सामना रद्द झाला तर मुंबई इंडियन्सच्या खात्यात 3 पॉईंट्स जमा होतील आणि ते नंबर 5 वर येतील तर आता तीन क्रमांकावर असलेली राजस्थान रॉयल्सला सुद्धा 1 पॉईंट मिळेल आणि एकूण 5 पॉईंट्स होऊन ते दुसऱ्या स्थानावर जातील. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More