Rahi Sarnobat : भारताची नेमबाज राही सरनोबत हिला आठ वर्षांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती समोर आली.

Rahi Sarnobat : भारतासाठी नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज राही सरनोबत (Rahi Sarnobat) हिला गेल्या आठ वर्षांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. मूळ कोल्हापूरच्या राही सरनोबत हिची 2014 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीचे 3 वर्ष त्यांना पगार मिळाला मात्र त्यानंतरचे पुढील आठ वर्ष त्याला पगार मिळालेला नसल्याचं समोर आलंय. राही हिने प्रशिक्षणाची तीन वर्ष पूर्ण न केल्याने त्यांना पगार नाकारण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिलं जातं आहे. मात्र राही ही भारताकडून विविध नेमबाजी स्पर्धांमध्ये भाग घ्यायची त्यामुळे तुला प्रशिक्षणासाठी वेळ देता आला नाही असं सांगण्यात येतंय. यासंदर्भात आमदार अमित गोरख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर अजित पवारांनीही लक्ष घातल्याचं त्यांनी म्हटलं जातं आहे.
कोल्हापूरची राही सरनोबत ही आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू असून तिनं भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी तिला तीन वर्ष प्रशिक्षण घ्यायचे होते, परंतु स्पर्धा आणि सराव इत्यादींमुळे तिला प्रशिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. भारतीय संघाचा भाग असल्याने राहिला प्रशिक्षणासाठी पूर्ण वेळ देता आलेला नाही. तीन वर्ष तिला पगार देण्यात आला परंतु त्यानंतर तिला पगार देण्यात आलेला नाही. नियमित पगार नसल्याने तिला बॅंकेकडून लोन घेता येत नाहीये. राही आणि तिच्या कुटुंबाने प्रशासनाकडे वारंवार यासंदर्भात दाद मागितली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता आमदार अमित गोरख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राहीने अजित पवारांची भेट सुद्धा घेतली होती.
राही सरनोबत ही 25 मीटर पिस्तूल नेमबाज आहे. राहीचा जन्म 30 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. राही सरनोबत हिला 2018 रोजी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राही सरनोबतने 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राही 2016 च्या रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती, परंतु तिच्या दुखापतीमुळे ती स्पर्धा करू शकली नाही. 2008 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत राहीने तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने दोन सुवर्णपदके जिंकली. राही सरनोबत ही दोन वेळा ऑलिंपियन राहिलेली ही आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज होती आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज होती.