)
Prithvi Shaw on his Cricket Career: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे आणि आयपीएलमध्येही त्याला संधी मिळालेली नाही. एकेकाळी भारताचा भविष्यकालीन सुपरस्टार मानला जाणारा पृथ्वी आता पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी संघर्ष करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या करिअरच्या घसरणीमागचं कारण स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याने काही लोकांना याचं दोषी मानले आहे.
2018 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार पृथ्वी शॉने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात दमदार केली होती. पदार्पणाच्या टेस्ट सामन्यात त्याने 134 धावा केल्या होत्या आणि लगेचच त्याची तुलना सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या दिग्गजांशी केली जाऊ लागली होती. पण काही वर्षांतच त्याची फॉर्म, फिटनेस आणि संपूर्ण वर्तणूक चर्चेचा विषय ठरू लागली. आता त्याने स्वतःच कबूल केलं आहे की, काही चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे तो क्रिकेटपासून दूर गेला आणि याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला.
न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी म्हणाला, "मी आयुष्यात बऱ्याच चुका केल्या. पूर्वी मी दिवसाचे 8 तास ग्राउंडवर असायचो, नेटमध्ये 3-4 तास फलंदाजी करायचो. पण हळूहळू माझं लक्ष भटकू लागलं. मी क्रिकेटला वेळ देणं कमी केलं. जे गरजेचं नव्हतं, ते मला गरजेचं वाटू लागलं." तो पुढे म्हणाला, "त्या काळात मी काही चुकीच्या लोकांशी मैत्री केली. मी जेव्हा टॉप फॉर्ममध्ये होतो, तेव्हा ते मला चुकीच्या दिशेने घेऊन गेले. त्यामुळे मी माझ्या मूळ ट्रॅकवरून भटकलो. एकेकाळी मी नेटमध्ये थकत नव्हतो, आता 4 तास प्रॅक्टिस करताना थकल्यासारखं होतं."
पृथ्वी शॉने 2018 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. त्याने 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी20 सामना भारतासाठी खेळला आहे. टेस्टमध्ये 339, वनडेमध्ये 189 धावा केल्या. मात्र 2021 नंतर तो टीम इंडियाच्या कुठल्याही फॉर्मेटचा भाग राहिलेला नाही. यंदाच्या आयपीएल लिलावातही तो अनसोल्ड राहिला होता, जे त्याच्या करियरच्या घसरणीचं मोठं संकेत मानलं जातंय.