खळबळजनक! रोहितमुळे संघात पडली असती फूट? 'या' दोघांनी त्याला कर्णधारपदावरुन काढलं

Rohit Sharma Spoiling Dressing Room Culture: रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय दोन व्यक्तींनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2025, 01:45 PM IST
खळबळजनक! रोहितमुळे संघात पडली असती फूट? 'या' दोघांनी त्याला कर्णधारपदावरुन काढलं
रोहित शर्माच्या उचल बांगडीचं खरं कारण आलं समोर? (फोटो एक्सवरुन साभार)

Rohit Sharma Spoiling Dressing Room Culture: ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरील 3 एकदिवसीय सामन्यांसाठीच्या मालिकेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं असलं तरी रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या निर्णयाबाबत निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरने यासंदर्भात माहिती देताना तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेट प्रकारामध्ये तीन वेगवेगळे कर्णधार असणे जवळपास अशक्य आहे, असं स्पष्ट केलं. मात्र रोहितची अशापद्धतीने उचल बांगडी होण्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण असल्याची माहिती समोर आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

संघातील वातावरणावर नकारात्मक परिणाम

भारताचं नेतृत्व रोहितकडून काढून शुभमनकडे देण्यामागे रोहितचं ड्रेसिंग रुममधील वागणं कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. रोहितने ड्रेसिंग रुममध्ये आपल्या मनाप्रमाणे कारभार करु नये अशी निवड समितीची इच्छा नव्हती. असं झालं असतं तर त्याचा संघातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं निवड समितीचं म्हणणं होतं. मात्र रोहितबद्दलच्या या मतांमुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

संघामध्ये अंतर्गत समस्या

'बीसीसीआय'च्या एका सूत्राने रोहितचा अनुभव हा तो कर्णधार राहण्याच्या आड आल्याचे संकेत दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. रोहितने कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली असून सध्या तो फक्त एकदिवसीय सामने खेळतो. हा सध्याच्या काळात सर्वात कमी खेळला जाणारा क्रिकेटचा प्रकार आहे. त्यामुळेच कर्णधार म्हणून रोहितला एकदिवसीय सामन्यांसाठी कायम ठेवणं संघाच्या जडघडणीच्या दृष्टीने धोकादायक होतं. यामुळे संघामध्ये अंतर्गत समस्या निर्माण होऊ शकतील असं निवड समितीला वाटत होतं. 

रोहितमुळे संघात वाद

"खेळाडू म्हणून रोहितचं स्थान फार मोठं आहे. तो कर्णधार राहिला असता तर त्याने कदाचित त्याची मतं ड्रेसिंग रुममध्ये लादली असती. तो सध्या केवळ एकदिवसीय सामने खेळतोय. अशा परिस्थितीमध्ये संघातील वातावरण बिघडण्याची शक्यता होती," असं बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे. संघाच्या टीम स्पीरिटसाठी मर्यादित षटकांच्या या फॉरमॅटमध्ये केवळ एकाच प्रकारचं क्रिकेट खेळणाऱ्या रोहितकडे नेतृत्व कायम ठेवणं धोकादायक ठरलं असतं, अशी भीती बीसीसीआयला होती. म्हणूनच रोहितला कर्णधारपदावरुन दूर करण्यात आलं. म्हणजेच रोहितमुळे संघात वाद निर्माण होऊ शकतात अशी शंकेची पाल निवड समितीच्या सदस्यांच्या मनात चुकचुकल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

...म्हणून गिलला कर्णधार करण्याची घाई

रोहित शर्माला पदावरुन हटवण्याचा निर्णय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आगरकरने संयुक्तपणे घेतला आहे. गंभीर हा प्रशिक्षक म्हणून सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये कमकुवत वाटला. तरी नंतर त्याने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्तम पद्धतीने संघ हाताळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर आणि आगरकर 2027 च्या वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून संघ बांधणीचा विचार करुन निर्णय घेत आहेत. रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंच्या कामगिरीमध्ये अचानक पडझड दिसू शकते, अशी शक्यताही नाकारता येणार नसल्याचं या दोघांचं मदत आहे. गिलला लवकरात लवकर कर्णधार जाहीर केल्यास पुढील दोन वर्षांमध्ये त्याने संघाला आकार द्यावा अशी या दोघांची अच्छा आहे.  रोहित आणि कोलही दोघांनाही आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमनच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More