कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? पत्रकार परिषदेत स्पष्टच बोलला

Rohit Sharma On Ranji Trophy : कर्णधार रोहित शर्मा आगामी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार की नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नाला शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने उत्तर दिले. 

पूजा पवार | Updated: Jan 18, 2025, 07:36 PM IST
कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? पत्रकार परिषदेत स्पष्टच बोलला
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025)  टीम इंडियाची घोषणा केली. 15 खेळाडूंच्या या संघामध्ये काही अनुभवी खेळाडूंसह युवा स्टार खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. सध्या रोहित शर्माचा फॉर्म फार समाधानकारक नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये देखील रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या बैठकीत स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आगामी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार की नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नाला शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने उत्तर दिले. 

Add Zee News as a Preferred Source

काही दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआयच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश देण्यात आले होते. बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे आहे त्यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणे महत्वाचे आहे. रोहित शर्मा 2015 मध्ये मुंबई संघातून रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता. तसेच 2018 पासून तो देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे. आगामी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार की नाही याबाबत प्रश्न विचारला असता रोहितने तो मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनी रोहित रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. रोहित शर्माने मंगळवारी मुंबई संघासोबत वानखेडे स्टेडियमवर सराव सुद्धा केला. रोहित शर्मा मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी उपलब्ध असेल. 

हेही वाचा : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र ....

रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत म्हणाला की, "गेल्या सहा-सात वर्षांचे आमचे कॅलेंडर पाहिले तर असे कधीच घडले नाही की आम्ही 45 दिवस घरी बसलो आहोत. हे तेव्हाच घडते जेव्हा आयपीएल संपल्यानंतर लगेच कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नसतो". रोहित पुढे म्हणाला, "देशांतर्गत सामन्यांचा सीजन हा ऑक्टोबरमध्ये सुरू होतो आणि मार्चपर्यंत चालतो. जे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी सर्व फॉरमॅट खेळत नाहीत ते जेव्हा देशांतर्गत क्रिकेट सुरु असेल त्यात ते खेळू शकतात".

कर्णधार रोहीत शर्मा म्हणाला, "मला स्वतःबद्दल बोलायचे झाल्यास 2019  पासून मी नियमितपणे टेस्ट क्रिकेट खेळतोय. अशात तुम्हाला स्वतःसाठी खूप थोडा वेळ मिळतो. जेव्हा तुम्ही नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ स्वतःला देणं गरजेचं असतं. त्यामुळे असं नाही की कोणता क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटला हलक्यात घेतंय". 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More