)
India vs Australia: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाकडे लक्ष लागलं असतानाच ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात मात्र दोघेही अपयशी झाले आहेत. मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघेही दमदार पुनरागमन करतील असा विश्वास दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांना फक्त वेळेची आणि लय मिळवण्यासाठी सरावाची गरज असल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे.
कोहली आणि रोहित यांनी सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. परंतु पर्थच्या कसोटी सामन्यात त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांनी अनुक्रमे 0 आणि 8 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाजांच्या अपयशी कामगिरीच्या जोरावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली.
गावसकरांनी मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बाजू घेतली आहे. पर्थमध्ये चेंडू उसळी घेत असताना तिथे खेळणं नक्कीच अवघड होतं असं त्यांनी म्हटलं आहे. "ते ऑस्ट्रेलियातील कदाचित सर्वात उसळत्या खेळपट्टीवर खेळत होते. त्यामुळे ते सोपं नव्हतं. विशेषतः ज्या खेळाडूंनी काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही त्यांच्यासाठी हे सहज नव्हतं. नियमितपणे खेळणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठीही खेळणं आव्हानात्मक होतं," असं गावस्करांनी इंडिया टुडेला सांगितलं.
भारताच्या कामगिरीबद्दल मात्र ते आशावादी राहिले आहेत. एकदा कोहली आणि रोहितने मधल्या फळीत आणि नेटमध्ये जास्त वेळ घालवला की ते लवकरच सूर गवसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"भारत अजूनही एक खूप चांगला संघ आहे. पुढील दोन सामन्यांमध्ये रोहित आणि कोहलीने मोठी धावसंख्या उभारली तर आश्चर्यचकित होऊ नका. ते जितके जास्त खेळतील, तितका जास्त वेळ नेटमध्ये घालवतील, तितक्या लवकर त्यांना त्यांची लय मिळेल. एकदा त्यांची कामगिरी सुधारली तर भारताची धावसंख्या 300 किंवा 300 पेक्षा जास्त होईल," असं गावसकर पुढे म्हणाले.
अॅडलेडमधील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाला पुनरागन करण्यासाठी चांगली संधी आहे. कारण येथील स्थिती भारतीय संघाच्या फायद्याची आहे. कोहलीने या मैदानावर मोठे विक्रम रचले आहेत. अॅडलेड ओव्हलवरील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने 61 च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आहेत. तिथे त्याचा कसोटी विक्रम आणखी उल्लेखनीय आहे. पाच सामन्यांमध्ये 53.70 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकं आहेत.