)
Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करून देशभरात चर्चेत आलेला युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आपल्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या मूळ गावी परतला. अवघ्या 15 वर्षांच्या या क्रिकेटपटूचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्याला पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. वैभवच्या यशामुळे संपूर्ण ताजपूर गाव अभिमानाने भारावून गेले आहे.
आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर वैभव सूर्यवंशी प्रथमच आपल्या मूळ गावी परतला. ताजपूरमध्ये त्याच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, मित्र, नातेवाईक आणि क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. गावात ठिकठिकाणी त्याचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी फुलांचे हार घालून आणि घोषणाबाजी करत या युवा खेळाडूचा सत्कार केला.
वैभवला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही मोठ्या संख्येने ताजपूरमध्ये दाखल झाले. अनेक युवक, विद्यार्थी आणि लहान मुलांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. काही काळासाठी गावातील वातावरण एखाद्या सेलिब्रिटीच्या स्वागत सोहळ्यासारखे झाले होते. वैभवनेही चाहत्यांना निराश न करता त्यांच्याशी संवाद साधला आणि छायाचित्रांसाठी वेळ दिला. वैभवच्या घराबाहेर इतकी गर्दी झालीय की त्याला घराबाहेर पडणंही कठीण झालंय.
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर हे साधे आणि लहान शहर मानले जाते. याच ठिकाणाहून क्रिकेटची स्वप्ने पाहणाऱ्या वैभवने कठोर मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. त्याच्या यशामुळे ताजपूरची ओळख देशभर पोहोचली आहे. गावातील तरुणांसाठी तो प्रेरणास्थान बनला असून अनेक जण आता क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत.
वैभवच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्याच्या वडिलांनी क्रिकेटसाठी मोठे त्याग केले. प्रशिक्षणासाठी लांबचा प्रवास, आर्थिक अडचणी आणि सातत्यपूर्ण पाठबळ यामुळे वैभवला योग्य संधी मिळाली. घराजवळ सरावासाठी विशेष नेट उभारण्यात आले होते. या मेहनतीचे फळ आता संपूर्ण कुटुंबाला मिळताना दिसत आहे.
आयपीएलमधील यशानंतर वैभवकडून आता भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांच्या मते, त्याने आतापर्यंत अनेक विक्रम मोडले असून भविष्यात तो भारतीय क्रिकेटचा मोठा चेहरा बनू शकतो. वैभवचे यश हे केवळ एका खेळाडूचे नसून संपूर्ण बिहारसाठी अभिमानाची बाब असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.