अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुळात ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरु व्हायला आला तरीही थंडीचा थांगपत्ता नसल्यानं आता हिवाळा नेमका कधी सुरू होणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 5 नोव्हेंबरनंतर हा अवकाळी पाऊसही माघारी फिरून हळूहळू गारठा वाढेल आणि बहुप्रतिक्षित अशा थंडीची चाहूल लागेल.
सध्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा इथं 'मोंथा' चक्रीवादळाचा प्रभाव असल्या कारणानं पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
गुरुवारी रात्री सुरतनजीकच हे कमी दाबाचे क्षेत्र धडकणार असून, त्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणात दिसून येईल. ज्यामुळं या आठवडाअखेरीसही महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या अखेरीस मात्र हवामानाची ही स्थिती बदलणं अपेक्षित असून, 5 नोव्हेंबरपासून त्यासाठीची वातावरणनिर्मिती सुरु होईल.
तेव्हा आता उकाडा, अवकाळी निवळून हळूहळू राज्यात थंडी वाढणार असंच हवामान विभागाकडून सांगण्यात आल्यानं यंदा तापमानाचा निचांकी आकडा कुठं पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.