पावसानं चांगलाच जोर धरलेला असल्यानं अनेकांचीच पावलं सहलीच्या ठिकाणांकडे वळत आहेत.
नोकरदार वर्गाला फारशा सुट्ट्या मिळत नसल्यानं आपल्या शहरानजीक कुठेतरी जाण्यासाठी मग ठिकाणाची शोधाशोध होते आणि नेमकं कुठं जायचं हेच अनेकांना उमगत नाही.
जाणून आश्चर्य वाटेल, पण ठाण्यापासून अवघ्या 67 किमी अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथं पावसाच्या दिवसांमध्ये जाणं म्हणजे स्वर्गसुख.
अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारं हे ठिकाण इतकं कमाल आहे की इथं पावसाचे ढग, धुकं अगदी अंगणातही अवतरतं.
डोंगरांच्या कुशीत दडलेल्या या ठिकाणाचं नाव आहे कर्जत. निसर्गाच्या अगाध लीला असणाऱ्या या ठिकाणी शहरी धकाधकीचा लवलेष इथं आल्यावर फारसा जाणवत नाही.
इथं राहण्यापासून ते अगदी साहसप्रेमींसाठी ट्रेक आणि ट्रेलच्याही सुविधा आहेत. स्थानिकांना यातूनच रोजगारसुद्धा मिळत आहे. हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू कर्जतला येण्यासाठी उत्तम. त्यातही पावसाळ्यात तर इथं येण्याचा आनंद काही औरच.
ठाण्यासोबतच नवी मुंबई आणि मुंबईपासूनही कर्जत फारसं दूर नसल्या कारणानं अगदी छोटासा प्लान करायचा असल्यास हे ठिकाण तुमच्या यादीत असायलाच हवं.