मुंबईत अशा कैक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत, ज्या या शहराच्या इतिसात डोकावण्याची संधी देतात. अशीच एक वास्तू मुंबईची ढाल म्हणूनही ओळखली जाते.
ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात असणारी ही वास्तू पाहण्यासाठी भारतीयांसमवेत परदेशी नागरिकांचीही गर्दी असते.
असं म्हणतात की, मुंबईचं सर्वात सुरेख दृश्य इथूनच दिसतं. ही वास्तू इतकी भक्कम आहे, की तिच्यावर समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मारा झाला, कितीही वादळं आली तरीही ती मात्र जैसे थे आहे त्या ठिकाणी उभी आहे.
आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल ही वास्तू आहे गेटवे ऑफ इंडिया. किंग जॉर्ज पाचवे आणि क्वीन मेरी यांच्या भारतातील आगमनासाठी ही वास्तू उभारण्यात आली.
1911 मध्ये तिचा पाया रचला खरा पण, या वास्तूचा अंतिम आराखडा 1914 ला पूर्ण झाला. जॉर्ज विटेट यांनी त्याची निर्मिती केली होती. तब्बल 10 वर्षांनंतर 1924 ला या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं.
ही 85 फूट उंच वास्तू बेसॉल्ट खडकापासून तयार करण्यात आली आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वास्तूंमध्ये हे ठिकाण अग्रस्थानी आहे असं म्हणणं गैर नाही.
थोडक्यात मुंबईत कधी बाहेरचं कुणी येणार असेल तर शहराचा हा अभिमान बघणं म्हणजे जणू, 'शास्त्र असतं'!