कोल्हापुरात NCP ची अनपेक्षित युती! अजित पवारांचे नेतेही झाले आश्चर्यचकित, हसन मुश्रीफ यांच्यावर माफी मागण्याची वेळ

Hasan Mushrif on NCP Alliance: कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती झाली आहे. यानंतर हसन मुश्रीफ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2025, 07:27 PM IST
कोल्हापुरात NCP ची अनपेक्षित युती! अजित पवारांचे नेतेही झाले आश्चर्यचकित, हसन मुश्रीफ यांच्यावर माफी मागण्याची वेळ

Hasan Mushrif on NCP Alliance: कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे युती झाली, असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. हसन मुश्रीफ यांनी या अनपेक्षित युतीबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून खुलासा केला आहे. 
         
हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो.
      
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "तसंच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ  नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल,  याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या  चर्चेमधून गैरसमज  पण दूर होईल, याची मला खात्री आहे".

Add Zee News as a Preferred Source

         
"सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही. याबाबत 18 नोव्हेंबर रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
         
"कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या.  कै. शामराव भिवाजी पाटील व  कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब,  कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व  कै.  विक्रमसिंहराजे घाटगे,  मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु; यामध्ये "ईडी" ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. "देर आये..... दुरुस्त आये.....!," असंही ते म्हणाले आहेत.
         
आता आपली सर्वांची जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे. त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करू. बाकी; सर्व पत्रकार परिषदेमध्ये मन मोकळे करु असं ते अखेरीस म्हणाले आहेत.

 

 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More