)
Gautami Patil Car Accident: अभिनेत्री गौतमी पाटीलच्या अडचणी दिवसोंदिवस वाढत चालल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये एका रिक्षा चालकाला ज्या भरधाव कारने धडक दिली ती कार गौतमीच्या मालकीची असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. अवघ्या काही तासांमध्ये चालकाला अटक करण्यात आली. या दुर्घटनेमध्ये मरगळे अडनाव असलेला 44 वर्षीय रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या रिक्षाचालकावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. असं असतानाच दुसरीकडे या विषयाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. यापैकीच एका पोस्टमध्ये एका अभिनेत्याने गौतमीला झापल्याचं पाहायला मिळत आहे.
जखमी मरगळेंच्या कुटुंबियांनी गौतमी पाटीलची चौकशी करुन तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपाचे नेते तसेच मंत्री चंद्राकांत पाटील यांची भेट घेऊ कठोर कारवाई करावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे. अपघात झाला तेव्हा गौतमी कारमध्ये होती की नव्हती यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका दाव्यामध्ये गौतमीच कारमध्ये होती असं सांगत तिला अटक करण्याची मागणी केली जात आहे.
गौतमी पाटीलला या प्रकरणामध्ये पोलिसांनी नोटीस देखील पाठवली आहे. कार गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने तिला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची नोटीस पाठवली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी दिली. असं असतानाच आता एका मराठी अभिनेत्याने गौतमी पाटीलला सुनावलं आहे.
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहे. मग तू काय गोरगरीब जनतेला ही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का? तुझी कार एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस, परत तुझ्या गाडीत कोण कोण होत हे ही तुलाच माहीत. पोलिस यायच्या आधी तुझी गाडी उचली जाते प्रकरण दाबण्यासाठी. बिचाऱ्या रिक्षा चालकाला किती लागलंय, त्याच काय झालंय? चौकशी न करता पळ काढता, कारण तुझे काळे धंदे बाहेर येतील म्हणून!" असा घणाघात अभिनेता पवन चौरेने केला आहे.
फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पवनने आपल्या भावना व्यक्त करताना, "आज रिक्षा चालक दीनानाथ रुग्णालयात व्हेंटेलीटरवर आहे या घटनेला चार दिवस झाले तरी तू साध एक माणुसकी च्या नात्याने विचारपूस पण केली नाहीस हेच तुझे संस्कार का? एक गोष्ट लक्ष्यात ठेव एक सामान्य माणूस जेवढा वरती घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो. तुझ्या या कृत्याचा जाहीर निषेध," असंही म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये पोलीस आपलं काही ऐकून घेत नसल्याचा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केला आहे.