मुंबईपासून 1,400 KM अंतरावर 21,00,00,00,000 रुपयांची महागुंतवणूक; भारताचा इराणमधील सर्वात मोठा प्रकल्प धोक्यात?

इराण आणि इस्त्रायल युद्धाचा मोठा फटका भारताला बसू शकतो. मुंबईपासून 1,400 KM अंतरावर भारताने 21,00,00,00,000 रुपयांची महागुंतवणूक केली आहे. भारताचा इराणमधील सर्वात मोठा प्रकल्प धोक्यात येवू शकतो. 

वनिता कांबळे | Updated: Mar 3, 2026, 07:44 PM IST
 मुंबईपासून 1,400 KM अंतरावर 21,00,00,00,000 रुपयांची महागुंतवणूक; भारताचा इराणमधील सर्वात मोठा प्रकल्प धोक्यात?

Chabahar Port Investment: इराण आणि इस्त्रायल युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे.  इस्रायल-अमेरिकन संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.  खामेनी यांच्या मृत्यूमुळे भारताला धोरणात्मकदृष्ट्या फटका बसू शकतो. कारण मुंबईपासून 1,400 KM अंतरावर असलेले चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. व्यापाराच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाच्या असलेल्या चाबहार बंदराच्या उत्तम कनेक्टीव्हिटीसाठी भारताने 21,00,00,00,000 रुपयांची महागुंतवणूक केली आहे.  इस्रायल-अमेरिकन हल्ल्यामुळे भारतासाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. धोका असा आहे की इराणचे चाबहार बंदर देखील धोक्यात येऊ शकते. हा प्रकल्प भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी जोडणारा एक महत्त्वाचा प्रवेशद्वार म्हणून काम करतो.

Add Zee News as a Preferred Source

सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणारी जहाचे पेटवून देऊ - इराणचा इशारा 

चाबहार बंदर भारतासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे.  या बंदरामुळे पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट संपर्क साधता योते. हे बंदर मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉरशी देखील जोडलेले आहे, ज्याचा उद्देश भारताला इराण आणि रशिया मार्गे युरोपशी जोडणे आहे. 
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षादरम्यान आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) ने सोमवारी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली. या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशारा लष्कराने दिला आहे.

पाकिस्तानवर अवलंबून राहू नये म्हणून भारताने चाबहार बंदर उभारले

भारतासाठी, हे बंदर केवळ जवळचे व्यापारी केंद्र नाही तर धोरणात्मकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बंदर मुंबईपासून अंदाजे 1,400 किलोमीटर अंतरावर आहे. गुजरातमधील कांडला बंदरापासून फक्त 1,000 किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या, ते भारताच्या स्थानिक बंदराइतकेच जवळ आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहू नये म्हणून भारताने चाबहार विकसित केला.

भारताने जरंजपर्यंत रस्ते आणि रेल्वे मार्ग देखील विकसित केलेत

 चाबहारपासून अफगाण सीमा फक्त 600 किलोमीटर अंतरावर आहे. भारताने येथून जरंजपर्यंत रस्ते आणि रेल्वे मार्ग देखील विकसित केले आहेत. या मार्गाने माल काबूल, हेरात आणि मजार-ए-शरीफपर्यंत पोहोचू शकतो. हा मार्ग पुढे उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि कझाकस्तान या मध्य आशियाई देशांकडे जातो. या देशांमध्ये तेल, वायू आणि कापूस यांची वाहतूक केली जाते.  परंतु समुद्राशी थेट प्रवेश नाही. चाबहार त्यांना समुद्राशी जोडतो.

चाबहार बंदरामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश

चाबहार भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश देतो. हा मार्ग पाकिस्तानला बायपास करतो. भारताने चाबहारला त्याच्या प्रमुख प्रकल्प, INSTC (आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर) मध्ये समाविष्ट केले आहे. या 7,200 किलोमीटरच्या नेटवर्कमध्ये समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्गांचा समावेश आहे. त्याचा उद्देश भारताला थेट युरोपशी जोडणे आहे. INSTC द्वारे, मुंबईहून माल चाबहारमध्ये येतो. जिथून तो ट्रेन आणि ट्रकमध्ये भरला जातो आणि नंतर इराणमधील झाहेदान आणि तेहरान, नंतर अझरबैजान आणि रशिया या बंदरांवर नेला जातो. तेथून, माल रेल्वेने मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि युरोपला नेला जाऊ शकतो. सुएझ कालव्याच्या तुलनेत या मार्गाने 40 टक्के वेळ आणि 30 टक्के खर्च वाचतो. 

खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारताच्या या प्रकल्पाचे काय होणार?

इराण मध्ये घडत असलेल्या घडामोडींचा भारताच्या संपूर्ण रणनीतीवर परिणाम होणार आहे.  भारताने 2024 मध्ये 10 वर्षांचा ऑपरेटिंग करार केला होता. आता याचे पुढे काय होणार हे  इराणच्या नवीन नेतृत्वाच्या धोरणांवर अवलंबून असू शकते. अमेरिकेचे निर्बंध भारताच्या इराणमधील सहभागातील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन निर्बंध राजवटीत सवलती रद्द करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पूर्वी चाबहारवर मर्यादित सहकार्याची परवानगी होती. निर्बंधांच्या दबावामुळे भारताने आधीच काही गुंतवणूक कमी केली आहे. जर भू-राजकीय तणाव आणखी वाढला तर भारत राजनैतिक संघर्ष टाळण्यासाठी सावधगिरी बाळगू शकतो. हे बंदर अदानी यांनी विकसीत केल्याचे समजते. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More