Balochistan Train Hijack : 'त्या' 214 बंधकांना फाशी; पाक लष्करानं अल्टीमेटम न पाळल्यानं बलूच बंडखोरांनी उचललं हादरवणारं पाऊल

Balochistan Train Hijack : बलूचिस्तानातील ट्रेन हायजॅकप्रकरणी धक्कादायक खुलासा. बंडखोरांनी खरंच 214 जणांना फाशी दिली? दाव्यानंतर एकच खळबळ...  

सायली पाटील | Updated: Mar 15, 2025, 12:23 PM IST
Balochistan Train Hijack : 'त्या' 214 बंधकांना फाशी; पाक लष्करानं अल्टीमेटम न पाळल्यानं बलूच बंडखोरांनी उचललं हादरवणारं पाऊल
Balochistan Train Hijack All 214 Hostages Killed After Pakistan Army Ignored Ultimatum Bla issued information

Balochistan Train Hijack : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रेल्वे हायजॅक करणाऱ्या बलूच लिब्रेशन आर्मी या बंडखोर गटाकडून सर्व 214 बंधकांना ठार मारल्याचा दावा केला जात आहे. शुक्रवारी बंडखोर संघटनेनं एक पत्रक जारी करत ही हादरवणारी माहिती दिली. जिथं, 214 बंधक हे पाकिस्तानी लष्करातील जवानच असल्याचं सांगितलं. 

मंगळवार (11 मार्च 2025) ला क्वेटाहून पेशावरच्या दिशेनं निघालेल्या जाफर एक्स्प्रेस या रेल्वेचा बलूच बोगद्यापाशी हायजॅक करण्यात आलं होतं. प्राथमिक स्वरुपात यामध्ये 150 हून अधिक बंधक असल्याचं म्हटलं गेलं. पण, बंधकांचा आकडा याहून बराच मोठा असून, त्यामध्ये बीएलएनं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलाचाही समावेश होता. 

सदर घटनेनंतर बीएलएनं पाकिस्तानचे 214 जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. तिथं पाकिस्तान सरकारनं मात्र बुधवारी रात्री बंधक संकट संपुष्टात आल्याची माहिती जाहीर केली आणि यामध्ये सर्व बीएलए बंडखोरांना ठार करण्यात आल्याचंही म्हटलं. मात्र त्यासंदर्भातील कोणताही फोटो किंवा व्हिडीओ मात्र जारी केला नाही. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीएलएनं खळबळदनक माहिती जारी करत पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं, जिथं त्यांनी पाकिस्तानच्या लष्करावर गंभीर आरोप लावत त्यांनी आपल्या जवानांच्या जीवाची बोली लावत दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं. 

शुक्रवारीच बीएलएचा प्रवक्ता जीयांग बलूचनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी राज्यावर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि बंधकांच्या सुटकेसाठी गंभीर वाटाघाटी करण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता.  ओलीस ठेवलेल्या सैनिकांच्या बदल्यात त्यांचे राजकीय कैदी सोडण्याची मागणी पाककडे केली होती. पण त्यांनी लक्ष न दिल्याने ओलिसांना ठार केल्याचा दावा बीएलएनं केला. 

हेसुद्धा वाचा : म्हणे 'दिल्लीत रचला गेला कट', बलूच ट्रेन हायजॅकप्रकरणी पाकिस्ताननं भारताविरुद्ध ओकली गरळ

“प्रत्येक क्षणाबरोबर, युद्धभूमीवर बीएलएचं श्रेष्ठत्व स्पष्ट होत आहे,” असं म्हणत या प्रवक्त्याकडून “ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर” या गटाने ज्याला “ऑपरेशन दरा-ए-बोलान” असं नाव दिल्याचंही म्हणत हा पाकिस्तानी लष्कराचा हा मोठा पराभव असल्याचं या बंडखोर गटानं सांगितलं.