)
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने दहशतवादी मुख्यालयांवर हल्ला केल्यानंतरही सतत वृत्त फेटाळून लावणाऱ्या पाकिस्तानमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर अखेर चार महिन्यांनी त्यांनी आपलं नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे ही कबुली इतर कोणी नाही तर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने दिली आहे. भारताने बहावलपूर येथे केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचं अखेर त्यांनी मान्य केलं आहे.
जैशच्या टॉप कमांडरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात उभा असणारा मसूद इलियास काश्मिरी त्यांच्या दहशतवादी संघटनेला झालेल्या नुकसानाची माहिती देताना दिसत आहे. काश्मिरीने यावेळी 7 मे रोजी बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह या जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबाचे 'तुकडे' झाले होते, असं सांगत आहे.
"सर्व गोष्टींचा त्याग केल्यानंतर 7 मे रोजी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबाचे भारतीय जवानांनी बहावपूर येथे तुकडे केले," असं काश्मिरी सांगतो.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती, बहावलपूर व्यतिरिक्त, भारताने पाकिस्तानच्या आतमध्ये शिरुन केलेल्या सर्वात धाडसी हवाई कारवाईत 8 इतर दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त झाली.
लाहोरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या पाकिस्तानातील 12 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बहावलपूरवर झालेल्या हल्ल्यात अझहरचे 10 नातेवाईक मृत्युमुखी पडले होते. त्यात त्याची बहीण, तिचा पती, त्याचा पुतण्या, त्याची भाची आणि कुटुंबातील मुले यांचा समावेश होता. पहाटेच्या हल्ल्यात अझहरचे चार सहकारीही ठार झाले.
पाकिस्तानने मात्र कधीही हे मान्य केलं नाही आणि सर्व दावे फेटाळून लावले. प्रत्यक्षदर्शी आणि परदेशी माध्यमांच्या वृत्तानुसार मे महिन्यात अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले होते. क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसणारा अझहरही काही मिनिटांतच उपस्थित राहिला आणि निघून गेला.
संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेला दहशतवादी, अझहर हा भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे. 2016 चा पठाणकोट हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला यामागे त्याचा होत होता, ज्यामध्ये 44 सैनिक शहीद झाले होते.
रिपोर्टनुसार, अजहर शेवटचा पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात दिसला होता, जो बहावलपूरपासून 1000 किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे. तो लोकप्रिय पर्यटन केंद्र असलेल्या स्कार्दूमध्ये दिसला होता. माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी अजहर अफगाणिस्तानमध्ये असू शकतो असा दावा केला होता.
FAQ
1) ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
ऑपरेशन सिंदूर ही भारताने पाकिस्तानविरुद्ध ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली लष्करी मोहीम होती. यात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली, ज्यात २६ नागरिक मारले गेले.
2) ऑपरेशन सिंदूरचे नाव का ठेवण्यात आले?
'सिंदूर' हे हिंदू विवाहित महिला भांगेत लावतात. जे वैवाहिक स्थितीचे प्रतीक आहे. भारत सरकारने हे नाव निवडले कारण हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पुरुषांच्या विधवांसाठी आणि पारंपरिक हिंदू मूल्यांसाठी हे प्रतीकात्मक आहे. मात्र, यावर काही टीका झाली आहे की हे पितृसत्ताक आणि स्त्रीवादी दृष्टिकोन दर्शवते.
3) ऑपरेशन सिंदूर कशामुळे सुरू झाले?
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पाहलगाम येथे जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लश्कर-ए-तैयबा (LeT) सारख्या पाकिस्तान-आधारित दहशतवादी गटांनी हल्ला केला, ज्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले.