राम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप

Ayodhya Ram Mandir : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jan 21, 2024, 03:57 PM IST
राम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप title=

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधलेल्या भव्यदिव्य राम मंदिर  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून यासाठी अयोध्येत तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. तर या सोहळ्यासाठी देशभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटी यासह अनेक साधू महंतांना आमंत्रित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने या सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची तर काही राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तमिळनाडून सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

तामिळनाडू सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रसारणावर बंदी घातली आहे, असा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन हा आरोप केला आहे. तामिळनाडूच्या अनेक भागात हृदयद्रावक आणि विचित्र दृश्ये पाहायला मिळत आहे. लोकांना गरिबांना जेवण देण्यापासून, मिठाई वाटण्यापासून, आनंद साजरा करण्यापासून रोखले जात आहे आणि धमकावले जात आहे, असाही आरोप निर्मला सीतारमन यांनी केला आहे.

निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले की, तामिळनाडू सरकारने 22 जानेवारी रोजी होणार्‍या अयोध्या राम मंदिर कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. "तामिळनाडू सरकार अनधिकृत लाइव्ह टेलिकास्ट बंदीचे समर्थन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहे. ही खोटी गोष्ट आहे. अयोध्या निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. ज्या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली त्यादिवशीही देशभरात ही समस्या अस्तित्वात नव्हती. तामिळनाडूमध्ये भगवान श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांमध्ये असलेला ऐच्छिक सहभाग आणि उत्साह याने हिंदुविरोधी डीएमके सरकारला खूप त्रास होत आहे," असे निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे.

"तामिळनाडूच्या अनेक भागात हृदयद्रावक आणि विचित्र दृश्ये पाहायला मिळत आहेत. लोकांना भजन आयोजित करण्यापासून, गरिबांना खाऊ घालण्यापासून, मिठाईचे वाटप करण्यापासून, उत्सव करण्यापासून रोखले जात आहे आणि त्यांना धमकावले जात आहे. लोकांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापणा करताना पाहायचे आहेत. लाइव्ह टेलिकास्ट दरम्यान वीज खंडित होण्याची शक्यता असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सना सांगण्यात आले आहे. इंडिया आघाडीचा प्रमुख भागीदार डीमएमकेची ही हिंदुविरोधी चाल आहे," असेही सीतारमन म्हणल्या.