महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra Latest News: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 11:02 AM IST
महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार?  हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल title=

Monsoon in Maharashtra Latest News: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरु होतो याची सर्वजण वाट पाहत आहेत. यादरम्यान आता सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Weather Department) सर्वाना आनंदाची बातमी दिली आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान विभागानं याबात माहिती दिली असून, यानुसार 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 11 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच यावर्षी पाऊस जवळपास 106 टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा अंदाज

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. अंदाजानुसार, 30 ते 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

विदर्भालाही इशारा

गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. 

राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.