INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. 

Updated: May 18, 2024, 11:57 AM IST
INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात title=

INDIA Alliance Press Conference : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार सभांचा अंतिम दिवस आहे. याच निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. "येत्या चार जूनपासून अच्छे दिनची सुरुवात होईल", असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

मुंबई लुटून गुजरातला नेण्याचा डाव

"देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान होत आहे. मुंबई लुटून गुजरातला नेण्याचा डाव आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे वैभव आम्ही परत आणू", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

"बेकायदा सरकार आणि अंसवैधानिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान स्वतःच्या हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत. जो देईल साथ, त्याचा करू घात हीच भाजपची नीती आहे. देशातील सर्व पक्ष संपवून भाजपच हा एकच पक्ष असेल, असे जे.पी. नड्डा म्हणाले होते. आता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही गरज राहिली नाही. ज्या संस्थेने त्यांना जन्म दिला. त्याच संस्थेची आता त्यांना गरज राहिलेली नाही. आता भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली स्वयंसेवक संघ म्हणतील. तसेच ते आता संघावरही बंदी घालतील. त्यामुळे आता संघालाही भाजपकडून धोका असल्याचे" उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

"आता नोटा बाहेर निघत आहे"

"गद्दारांना मिळालेले खोके आता फुटले आहेत. त्यातून आता नोटा बाहेर निघत आहे. त्याचे वाटप होत आहे. याबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. तसेच काही जणांकडून मतदानानंतर लावण्यात येणारी शाई लावण्यात येते, म्हणजे ते मतदान करू शकणार नाही. असे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार आढळल्यास त्या निवडणूक आयोगाच्या निर्दशनास आणून द्या", असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

"जे लोक देशभक्त शब्दांवर आक्षेप घेतात, ते हिंदू किंवा देशभक्त नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. सर्व हिंदू हे देशभक्त आहे. देशभक्त हा सर्वांना सामावून घेणारा शब्द आहे. देशभक्तमध्ये देशातील सर्व जातीधर्माचे नागरिक आहेत. जे देशभक्त शब्दाला आक्षेप घेतात, ते देशद्राही आहेत", असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

"48 पैकी कमीत कमी 46 जागा जिंकू"

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला. "महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. 48 पैकी कमीत कमी 46 जागा जिंकू असं वातावरण आहे. त्यांना शून्य जागा मिळतील असं मी बोलत नाही. त्यांना काही ना काही मिळेल, पण आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाला हरवेल", असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

"मोदी सरकारने इतर राज्यातही फोडाफोडीचे राजकारण केले. त्याविरोधात इंडिया आघाडी लढत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, हीच मोदी यांची लोकशाही आहे काय? सर्व सरकारी यंत्रणा मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मात्र, आता निवडणुकीत तसेच होणार नाही. आता जनताच या लढ्यात उतरली आहे. त्यामुळे आता जनतेचा विजय होणार आहे", असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

"महागाई आणि बेरोजगारी वाढली"

"मोदी दरवेळी विरोधकांवर आरोप करत विरोधकांना देशद्रोही ठरवत स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करत आहेत. मोदींनी दिलेले कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जीएसटीसारखा जाचक कर बदलून ही प्रणाली सरळ आणि सुटसुटीत करण्यात येणार आहे. आर्थिक राजधानी असलेल्या शहराकडेही मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या काळात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे", असा आरोपही मल्लिकार्जुन खरगेंनी केला. 

"काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. भाजपने जनतेशी विश्वासघात केला आहे. धमकी, दबावतंत्र आणि प्रलोभने दाखवत इतर पक्ष फोडण्यात आले. तसेच मूळ पक्ष इतरांना देण्यात आला. पंतप्रधान त्यांच्या भाषणात द्वेष पसरवत आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारची द्वेषपूर्ण वक्तव्ये केलेली नाही. महाराष्ट्रात बेकायदा पद्धतीने महायुतीचे सरकार बनवण्यात आले. या असंवैधानिक सरकारला पंतप्रधान पाठिंबा देतात", असेही मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटले.