Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मान्सून अंदमानाच दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल पुढच्या मार्गानं होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: May 22, 2024, 06:46 AM IST
Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा? title=
Maharashtra Weather News Mumbai Konkan to have cloudy sky vidarbha will vitness storm rain latest monsoon predictions

Maharashtra Weather News :  राज्यात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी लख्ख सूर्यप्रकाश आणि उन्हाचा दाह अशी स्थिती असल्यामुळं उकाडा चांगलाच जाणवत आहे. असं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र आता काळ्या ढगांची दाटी होण्यास सुरुवास झाली असून, पावसाची चिन्हं अगदी स्पष्ट दिसत आहे. या ढगाळ वातावरणामुळं पुणे, साताऱ्यामध्ये दिवस मावळतीला जाताना तापमानाच अंशत: घटही नोंदवली जात आहे. 

एकंदर हवामानाची स्थिती आणि दूरवर सक्रिय झालेला (Monsoon Updates) मान्सून पाहता महाराष्ट्रात तो निर्धारित तारखेच्या आधी धडकला तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पुढील 24 तासांतस आणखी 2 दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई (Mumbai, Thane) आणि रायगडमध्ये अंशत: ढगाळ वातावरणासह उष्णतेचा यलो अलर्ट आणि वातावरणातील दमटपणा अधिक जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, परभणी, अकोला, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर, सिंधुदुर्ग या भागांना वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. 

हेसुद्धा वाचा : खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज

कोकणात (Konkan) रत्नागिरी सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापुरात 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तिथं मंगळवारी यवतमाळमध्ये तुफान वादळ आणि वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार उडवला. शहराजवळील गोधनी, बरबडा, चौधरा या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. ज्यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर अनेक घरांवरील, दुकानांवरील टीनपत्रे उडाले. 

कोकणालाही पूर्वमोसमी पावसाचा फटका 

कोकणातही पूर्वमोसमी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात सोसाट्याट्याच्या वादळी वाऱ्यामुळं वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जवळपास 25 ते 30 गावं अंधारात असल्याचं पाहायला मिळालं. वीज पुरवठ्याअभावी इथं नागरिकांचे प्रचंड हाल झाले. 

मान्सून कुठं पोहोचला? 

अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून सकारात्मक वेगात दिसत असून, पुढील 48 तासांमध्ये हे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रासह मालदिवचाही मोठा भाग व्यापतील. ज्यामुळं बंगालच्या उपसागरासह अंदमान क्षेत्रातील समुद्रावर मान्सून अधिक बळकटीनं पुढे प्रवास करताना दिसेल. ज्यामुळं केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून, महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा धडाका पाहायला मिळणार आहे.