Rohit Sharma: तुम्हाला आताच सांगून काय करू? भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये का संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही फक्त वेस्ट इंडिजला जाऊ आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊ. या गोष्टींनंतर आम्ही प्लेइंग-11 बद्दल विचार करू. 

सुरभि जगदीश | Updated: May 2, 2024, 08:30 PM IST
Rohit Sharma: तुम्हाला आताच सांगून काय करू? भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये का संतापला रोहित शर्मा title=

Rohit Sharma: जून महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा केली असून त्यामध्ये 15 सदस्यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर अजित आगरकर यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये रोहित शर्माने प्लेईंग 11 बाबत देखील भाष्य केलं आहे. पाहूयात रोहित शर्मा काय म्हणाला?

परिस्थिती पाहून प्लेईंग 11 बाबत विचार करणार

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही फक्त वेस्ट इंडिजला जाऊ आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊ. या गोष्टींनंतर आम्ही प्लेइंग-11 बद्दल विचार करू. आम्हाला खेळपट्ट्यांबद्दल फारशी माहिती नाही. आम्ही न्यूयॉर्कमध्ये यापूर्वी खेळलो नाही त्यामुळे खेळपट्टी कशी खेळेल हे आम्हाला माहीत नाही. आम्ही वेस्ट इंडिजमध्ये खेळलो आहोत, पण तिथेही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी खेळू. त्यामुळे आधी खेळपट्टी कशी असेल हे पहावं लागेल. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही टीम कॉम्बिनेशनचा विचार करू. 

मिडल ऑर्डरमध्ये अधिकाधिक हिटर्स ही एक गोष्ट आमच्या लक्षात आली. आमच्याकडे टॉप ऑर्डरमध्ये फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. पण मधल्या ओव्हर्समध्ये आम्हाला असा खेळाडू हवा होता जो बिनधास्त फटके खेळेल. तो गोलंदाजी करतो की नाही याचा आम्ही फारसा विचार केला नाही. यासाठी शिवम दुबेची निवड करण्यात आली आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. 

बुमराहसोबत गोलंदाजीसाठी कोण करणार सुरुवात?

टी-20 वर्ल्डकपमध्ये बुमराहसोबत कोण गोलंदाजी करणार असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा काहीसा पत्रकारांवर संतापला होता. रोहित शर्मा म्हणाला, 5 जूनला सामना आहे. तुम्हाला आताच सांगून काय करू? तुम्हाला टीम कॉब्मिनेशनबाबत आताच का जाणून घ्यायचं आहे. या गोष्टीवर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. 

बऱ्याच दिवसांपासून टीम तयार करणं होतं सुरु

या पत्रकार परिषदेत रोहित पुढे म्हणाला की, टी-20 वर्ल्डकपसाठी आम्ही टीम तयार करायला खूप आधी सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्या बघून आम्हीही प्लेइंग-11 चा विचार करू लागलो. फक्त काही जागा शिल्लक होत्या. आम्ही आयपीएलच्या अगोदरच टीम तयार करण्यास सुरुवात केली होती. जे काही खेळाडू निवडले गेले आहेत, ते या फॉरमॅटमध्ये नवीन आहेत असं नाही.