IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!

India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.  

सौरभ तळेकर | Updated: Oct 8, 2023, 09:58 PM IST
IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी! title=
IND vs AUS, Virat Kohli, KL Rahul, World Cup 2023

Team india Beat Australia : चेन्नईचं चेपॉक मैदान... क्रिझवर विराट कोहली अन् केएल राहुल... टीम इंडियाची परिस्थिती 2 रन्सवर 3 आऊट ... सुकलेल्या चेहऱ्यांनी प्रेक्षक फक्त आणि फक्त विराट कोहलीकडे (Virat Kohli) पाहत होते. तर दुसरीकडे मिचल स्टार्क अन् जॉश हेझलवूड यांचा तिकट मारा सुरू होता. सामना गेला म्हणत प्रेक्षक मैदानातून जाण्याचा विचारच करत होते, पण कोहलीकडे पाहून सर्वांनी थांबा धरला. हळूहळू कोहलीने एक एक बॉल सोडून देत कसोटीचं रूप धारण केलं आणि केएल राहुलला (KL Rahul) सल्ला देत राहिला. टीम इंडियाची परिस्थिती बिकट होती, पीच आता स्लो होत होतं... बॉल बॅटवर बसणार हे विराटला पक्कं माहित होतं. त्यातून हळूहळू रस्ता धरत विराट कोहली अन् केएल राहुलने मैदानात पाय रोवला अन् टीम इंडियाची नौका विजयी पार केली आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 27 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी' देखील मोडून काढली आहे. 

वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया 199 धावा स्कोरबोर्डवर उभा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, इशान किशन अन् श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहली अन् केएल राहुल यांनी टीम इंडियाला विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. विराट कोहलीने 116 बॉलमध्ये 85 धावांची झुंजार खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने केएल राहुलने आपली तलवार चालूच ठेवली. त्याने अखेरपर्यंत झुंज दिली. राहुलने 115 बॉलमध्ये 95 धावांची खेळी केली. त्याचबरोबर टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. श्रीलंकेत 1996 मध्ये, ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना गमावला होता. त्यानंतर आता 27 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची दादागिरी मोडून काढली आहे. 

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला आऊट केलं. विराट कोहलीने स्लीपमध्ये भन्नाट कॅच घेतला अन् वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅचेस घेणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चिवट झुंज दिली. मात्र, कुपदीप यादवने वॉर्नरला तंबुत धाडलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने सुत्र हातात घेतली अन् 9 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन मुख्य फलंदाज बाद केले. स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि मार्नस लॅबुशेन यांना जड्डूने झटपट बाद केलं अन् ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकलं. 110 धावांवर 2 गडी बाद अशी धावसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया संघ 140 वर 7 आऊट, अशा परिस्थिती सापडला. त्यानंतर त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. मिशेच स्टार्क अन् पॅट कमिन्सच्या सावध खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 199 धावाच करता आल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात ऑलआऊट केलंय.

आणखी वाचा -  Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.