मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनक्षेत्र पूर्णतः बंद असताना नवोदित लेखक, कवी मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने सुरु केलेल्या "मधुरव" ह्या सोशल मीडियावर सुरु केलेल्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्युब व फेसबुक वर सुरु केलेल्या ‘मधुरव’ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील देशातील  अनेक वयोगटातील हौशी मंडळी जी लिखाणातून व्यक्त होतात त्यांच्या लिखाणाचे वाचन करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं व त्यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र ,गोवा, बेळगांव, हैद्राबाद, दिल्ली तसचं भारताबाहेर दुबई, अबुदाबी, मस्कत,ॲास्ट्रेलिया ,अमेरिका इथल्या मंडळींचा सहभाग ह्यात केला गेला होता. १०० हून अधिक मंडळींचं लिखाण वाचून त्यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण निर्माण केली व त्यांच्या ठायी आत्मविश्वास जागृत केला.


रसिक प्रेक्षकांना साहित्याच्या माध्यमातून सकारात्मकता दिली व वाचन संस्कृतीकडे पावलं वळवली. तसचं समाजातील ज्या घटकांमुळे आपण घरात सुखरूप आहोत त्यातील प्रतिनिधींना ह्या कार्यक्रमात बोलवून त्यांचे कौतुक लिखाणाच्या माध्यमातून करून त्यांच्या जबाबदारी व तणावपूर्ण आयुष्यात आनंदाचे चार क्षण निर्माण केले. कुठल्याही अपेक्षेशिवाय केवळ सर्वसमावेशक दृष्टीने मोलाचं काम केलं.


केवळ एवढ्यावरच न थांबता सुरू केलेला हा वसा पुर्णत्वास नेण्यासाठी ह्याच सर्व लिखाणाची, प्रकाशनाची जवाबदारी घेत “आतिषबाजी” हा दिवाळी ग्रंथ पुस्तक स्वरूपात तिने नुकतेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन अभिनेत्री मुक्ता बर्वे, डॉ. समीरा गुजर, राजू परुळेकर, मुग्धा गोडबोले ह्याच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ आहे.


लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा उत्तम वापर करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल थेट महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगत सिंह  कोश्यारी यांनी घेतली असून "कोविड योद्धा" म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला नुकतेच  सन्मानित करण्यात आले आहे.


कोरोना संकटाशी लढताना, सभोवताली असलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी सामाजिक बांधिलकीचे भान जपून होशी लेखक तसेच कवींना नवसंजीवनी देण्याचा छोटासा प्रयत्न या "मधुरव" उपक्रमातून  आम्ही केला. महाराष्ट्र सरकारने आमच्या या उपक्रमाची दखल घेऊन "कोविड योद्धा" म्हणून  मला सन्मानित केले यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. सोशल मीडियावर "मधुरव" चे दोन सीझन्स पार पडले. तब्बल ५००हून अधिक मेल्स आम्हाला आले त्यातून निवडक लेखक,  कविताकार अशा शंभर जणांना आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेतले आणि आता या "आतिषबाजी" दिवाळी ग्रंथातून त्यांचे लेख, कविता तुमच्यासमोर आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील असे अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने सांगितलं.