Amitabh Bachchan and Jaya Bachchan Wedding Menu : 'कौन बनेगा करोडपति 16' या छोट्या पडद्यावरील शोकडे सगळे प्रेक्षक हे मनोरंजन आणि माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचं सुत्रसंचालन बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. अमिताभ हे नेहमीच शोमध्ये हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकाशी गप्पा मारताना आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से सांगताना दिसतात. असंच काहीसं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये देखील झालं. यावेळी हॉटसीटवर ओडिशाच्या श्रावणी जेना बसली होती. त्यावेळी श्रावणीनं अमिताभ यांना तिच्या लग्नाविषयी सांगितलं त्याशिवाय तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. असं सगळं सांगत असताना तिनं अमिताभ यांना त्याच्या लग्नात मेन्यू काय होता असा प्रश्न विचारला. त्यावर बिग बींनी दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रावणीनं जेव्हा सुपरप्रश्नाचं योग्य उत्तर दिलं त्यानंतर अमिताभ यांनी तिला सोन्याचं नाणं हे भेट म्हणून दिलं. अमिताभ यांच्याकडून सोन्याचं नाणं मिळाल्यानं श्रावणी आनंदी झाली. तिला झालेल्या आनंदाविषयी सांगत श्रावणी म्हणाली, "सर, तुमच्याकडून सोन्याचं नाणं मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. सर, जसे दिवसेंदिवस सोन्याचे दर हे वाढत आहेत, तुम्ही थोडं स्पॉन्सर्सला सांगून मला डिस्काउंट मिळवून द्या, कारण मी अजून लग्नाची शॉपिंग केलेली नाही."


लग्नाच्या खरेदीसाठी डिस्काउंटची मागणी


श्रावणीनं लग्नाच्या खरेदीसाठी डिस्काउंटची मागणी ऐकून अमिताभ हसले आणि म्हणाले, " आता तुम्हाला काय खरेदी करायचे आहे, हे मला कसं माहित असणार. त्यानंतर बिग बींनी श्रावणीला तिच्या लग्नाबद्दल आणि तिच्या नवऱ्याविषयी विचारले. अमिताभ हे प्रश्न विचारत असताना श्रावणीनं लगेच त्यांना सांगितलं की कपड्यांपासून सगळ्याच गोष्टींवर तिला डिस्काउंट मिळवून द्या. हे ऐकताच अमिताभ तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. 


अमिताभ यांच्या लग्नाचा मेन्यू...


श्रावणीने अमिताभ यांना त्यांच्या लग्नात काय मेन्यू होता याविषयी पुढे विचारलं. श्रावणी म्हणाली, "आपल्या लग्नात जेवण काय होतं हे सगळ्यांच्या लक्षात राहतं. तर तुमच्या लग्नात जेवणाचा मेन्यू कोणी ठरवला होता?" यावर बिग बींनी उत्तर दिलं, "आमच्या लग्नात असं काहीही झालेलं नाही. एक दिवस सहज आम्ही विचार केला, 'चल, लग्न करुयात.' त्यावर जयानंही म्हटलं की, ' ठीक आहे.' आणि आम्ही लगेच लग्न केलं, त्यानंतर जयाला पत्नी म्हणून घरी आणलं. त्यावेळी घरात जे काही जेवणं होतं तेच खाल्लं.'


हेही वाचा : 'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'


हे सगळं ऐकल्यानंतर आश्चर्यचकीत झालेल्या श्रावणीनं पुढे विचारलं, "सर, जया मॅम काही बोलल्या नाही?" त्यावर उत्तर देण्याआधी अमिताभ थोडे शांत झाले आणि नंतर म्हणाले, "हो, अगदी असंच होतं. काही गाजा-वाजा नव्हता." अमिताभ आणि जया यांनी गुपचूप लग्न केलं होतं आणि त्यांच्या लग्नात फक्त जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. लक्षवेधी गोष्ट म्हणजे अमिताभ यांच्या वरातीत फक्त 5 लोकं आले होते.