मुंबई : अभिनेता रणबीर कपूरचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झालेले नाहीत. रणबीरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या जग्गा जासूसलाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी या अपयशाला दिग्दर्शक अनुराग बासूला जबाबदार धरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जग्गा जासूसच्या अपयशाला अनुराग बासू आणि संगीत दिग्दर्शक प्रीतम जबाबदार असल्याचं ऋषी कपूरनं मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. बुधवारपर्यंत अनुराग चित्रपटाचं मिक्सिंग करत होता. प्रितमनंही आठवड्याभरापूर्वीच चित्रपटाला संगीत दिलं, असं ऋषी कपूर म्हणालेत. अनुराग बासू चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणालाही दाखवत नाही यावरही ऋषी कपूर यांनी आक्षेप घेतला आहे. ते अणूबॉम्ब तयार करत आहेत का, असा सवाल ऋषी कपूर यांनी उपस्थित केला आहे.


अनुराग बासू हा एक बेजबाबदार दिग्दर्शक आहे, जो त्याचे चित्रपट पूर्ण करू शकत नाही. एकता कपूरनं अनुरागला तिच्या चित्रपटापासून लांब ठेवल्याचा निर्णय योग्य असल्याचं ऋषी कपूर म्हणाले आहेत.


गोविंदाच्या सगळ्या रोलला या चित्रपटातून कात्री लावण्यात आली. मग गोविंदाला आधी चित्रपटामध्ये घेतलंच का असं ऋषी कपूर यांनी विचारलं आहे. सिंगापूरसारख्या काही देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही यावरूनही ऋषी कपूर यांनी अनुरागला लक्ष्य केलं आहे. पाच दिवसआधी चित्रपट पोहोचणं आवश्यक असताना चित्रपट पोहोचला नसल्याचे आरोप ऋषी कपूर यांनी केले आहेत.