मुंबई : सोशल मीडियापासून क्रीडा आणि कलाविश्वापर्यंत वाहणारे लग्नसराईचे वारे वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही कायम राहण्याचीच चिन्हं आहेत. मुख्य म्हणजे या लग्नसराईच्या वातावरणात यंदाच्या वर्षी सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांचीच धामधूम जास्त पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातच आता भर पडली आहे ती म्हणजे एका 'बाहुबली' विवाहसोहळ्याची. 'बाहुबली' विवाहसोहळा... म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर सहाजिकच काही ठरलेले चेहरे उभे राहिले असणार. ते म्हणजे अभिनेता प्रभास आणि अनुष्का शर्माचे. पण, आणखी काही तर्क लावण्याआधी इथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे, हा विवाहसोहळा प्रभासचा नसून 'बाहुबली' ही अद्वितीय कलाकृती साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एस.एस. राजामौली यांच्या मुलाचा. 





एस.एस. कार्तिकेय हा राजामौली यांचा मुलगा दाक्षिणात्य गायिका आणि बऱ्याच काळापासून त्याची प्रेयसी असणाऱ्या पूजा प्रसाद हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. ३० डिसेंबरला जयपूर येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या खास आणि दिमाखदार विवाहसोहळ्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बी- टाऊनमधीलही कलाकारांनी आपला मोर्चा जयपूरकडे वळवला आहे. 




प्रभास, राम चरण, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, ज्युनिअर एनटीआर या कलाकारांनी विवाहस्थळी पोहोचत धमाल करण्यास सुरुवात केली आहे. तर, अभिनेत्री सुष्मिता सेन हिसुद्धा या विवाहसोहळ्यासाठी जयपूरमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे. सोशल मीडियावर या बाहुबली विवाहसोहळ्याच्या चर्चा, फोटो आणि व्हिडिओंना उधाण आलं आहे. त्यामुळे सरतं वर्षही खऱ्या अर्थाने लग्नसराईतच पार पडणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.