मुंबई : हिंदी चित्रपट आणि जागतिक स्तरावरही चित्रपटांच्या या झगमगणाऱ्या दुनियेत काही कलाकारांची नावं मोठ्या आदरानं घेतली जाता. या कलाकारांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेता इरफान खान (Irrfan Khan). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त हिंदीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही इरफाननं त्याची छाप सोडली आहे. आज ते आपल्यात नसले, तरीही त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांची साक्ष देत असतात. 


इरफान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 ला जयपूरमधील एका मुस्लीम पठाण कुटुंबात झाला होता. 


साहबजादे इरफान अली खान, असं त्यांचं संपूर्ण नाव. त्यांचे वडील टायरचा व्यापार करत होते. 


पठाण कुटुंबातील असूनही इरफान बालपणापासूनच शाकाहारी होते, ज्यामुळं त्यांची कुटुंबातील मंडळी कायम खिल्ली उडवत. 


पठाण कुटुंबात हा ब्राह्मण मुलगा जन्माला आला आहे, असंच सर्वजण म्हणायचे. 


सुरुवातीचा संघर्ष
इरफान खान यांनी सुरुवातीला फार हलाखीचे दिवस काढले. एनएसडीला प्रवेश मिळाल्यानंतर त्यादरम्यानच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. 


परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहापोटी त्यांनी एसी दुरुस्त करण्याचं काम सुरु केलं. 


एके दिवशी ते सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरी एसी दुरुस्त करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची श्रीमंती पाहून इरफान अवाक् झाले. 


हळुहळू चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात त्यांच्या अभिनयाचं कसब इतरांवर जादू करू लागलं. यातही त्यांना संघर्ष चुकला नव्हता. 


एक अभिनेता म्हणून संपन्न होत असतानाच इरफान एक व्यक्ती म्हणूनही तितकेच संपन्न होत होते. 


त्यांच्या अस्तित्वानं अनेकांनाच नवी प्रेरणा मिळाली होती. जगण्याचे त्यांचे सिद्धांत बरंच काही सांगून गेले. 


सुतापाशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारण्याची तयारी... 
एनएसडीमधील मैत्रीण सुतापा सिकदर हिच्याशी त्यांनी 23 फेब्रुवारी 1995 मध्ये लग्न केलं. सुतापानं इरफान यांची त्यांच्या पडत्या काळात कायम मदत केली. 


सुतापाच्या प्रेमापोटी इरफान धर्मांतर करण्यासही तयार झाले होते. पण, इथं त्यांचं प्रेम जिंकलं आणि धर्मांमधील अंतर फिकं पडलं. 


सरतेशेवटी इरफान यांना धर्मांतर करण्याचीही गरज लागली नाही. 


32 वर्षांची लखलखणारी कारकिर्द 
चित्रपट जगतात 32 वर्षांच्या कारकिर्दीत इरफान खान यांची मोलाचं योगदान देत भारतीय चित्रपटांना समृद्ध केलं. 


राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा अभिनेता आज आपल्या नाही. पण, चित्रपटांच्या माध्यमातून मात्र त्यांचं अस्तित्वं कायमच जाणवत राहील हे खरं.