मुंबई : रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अभिनेते ऋषी कपूर काही दिवसांपासून या कलाविश्वापासून दूर आहेत. यामागचं कारणही तसंच होतं. कर्करोग, अर्थात कॅन्सरने ग्रासल्यामुळे त्यांच्यावर परदेशात उपचार सुरु होते. ज्यासाठी ते अनेकर महिने मायदेशापासून दूर राहिले होते. पण, आता मात्र उपचार घेतल्यानंर आणि आजारपणातून बऱ्याच प्रमाणात सावरल्यानंतर ऋषी कपूर यांची घरवापसी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच ते भारतात परतले, त्यावेळी मुंबई विमानतळावर माध्यमांच्या अनेक प्रतिनिधिंनी त्यांची एक झलक टीपण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. भारतात परतण्याचा आनंद नीतू आणि ऋषी या दोघांच्याही चेहऱ्यांवर स्पष्टपणे पाहायला मिळत होता. 


खुद्द ऋषी कपूर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी परतण्याची आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. एक ट्विट करत त्यांनी लिहिलं, 'घरी परतलो आहे.... तेसुद्धा ११ महिने आणि अकरा दिवसांनंतर. मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे...'. 





आजारपणामुळे कलाविश्वापासून दूर असणाऱ्या ऋषी कपूर यांनी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्क ठेवला आहे. आजारपणाच्या प्रत्येक टप्प्याविषयी आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते कायमच व्यक्त होत राहिले. त्यातच आता मायदेशी परतल्यामुळे कपूर यांच्या चाहत्यांच्या वर्तुळात आणि संपूर्ण कलाविश्वात आनंदाचतं वातावरण पाहायला मिळत आहे.