मुंबई : नातं आकारास येण्यास जितका वेळ लागतो तितका किंबहुना त्याहून फार कमी वेळ नात्यातील विश्वासाला तडा जाण्यास आणि त्याच नात्यात दुरावा येण्यास लागतो. हिंदी कलाविश्वात नात्यांच्या या बंधातून मुक्त होण्याचा निर्णय एका सेलिब्रिटी जोडप्याने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून नात्यात आलेल्या दुराव्याविषयी माहिती देणारी ही जोडी आहे, अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा पती साहिल संघा यांची. कोणतंही कारण स्पष्ट न करता आपण या वैवाहिक नात्याच्या बंधनातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं दियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. 


आतापर्यंत गरज पडेल तेव्हा मदतीसाठी आलेल्या मित्रांचे आभार तिने मानले आहेत. शिवाय, तिने साहिलच्या वतीनेही त्यांच्या नात्यातील या निर्णयामागच्या कारणांच्या गोपनियतेचा सर्वांनीच आदर करावा अशी विनंती केली. 



'अकरा वर्षांच्या या प्रवासात एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आम्ही परस्पर समजुतीने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यातील मैत्री कायम राहील. शिवाय गरज असेल तेव्हा कायम आम्ही एकमेकांसाठी तितक्याच प्रेमाने आणि आदराने उभे असू. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरीही, एकमेकांसोबत असणाऱ्या नात्यातील बंधासाठी आम्ही कायमच कृतज्ञ राहू', असं तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं. सोबतच मित्रपरिवार आणि माध्यमांचे आभार मानत गोपनियतेचा आदर करण्याची विनंतीही केली. 



१८ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली होती. काही महिन्यांपूर्वीच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात त्यांनी एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.