नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दुसरीकडे बॉलीवुड खिलाडी अक्षय कुमार या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचे दिसून आले. त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटीचा आर्थिक निधी देऊन मोठं उदाहरण समोर ठेवलं आहे. दान करण्यात आलेली आतापर्यतची ही मोठी रक्कम आहे. तो केवळ मोठ्या पडद्यावरचा नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील हिरो असल्याचे त्याने दाखवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयच्या या निर्णयाचे सोशल मीडियातून कौतूक होत आहे. अक्षयची पत्नी ट्विकंल खन्नाने देखील यासंदर्भात ट्विट करत अक्षयचं कौतूक केलं आहे. मला माझ्या पतीचा गर्व आहे. जेव्हा मी त्याला विचारले की खरंच २५ कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देतोयस ? कारण ही खूप मोठी रक्कम आहे. तर अक्षयने यावर तात्काळ उत्तर दिले. मी जेव्हा करियरची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आता मी मदत करण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना मदत करण्यापासून मी कसा काय रोखू शकतो ? असे तो म्हणाला. 



मी कोण आहे चॅरिटी करणारा ?, आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. हा निधी माझ्या आईकडून माझ्या आईसाठी असल्याचे तो म्हणाला. इथे माझ्या आईचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाच्या संकटात ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष होण्याची भीती वाटते. माझ्या आईचा जीव माझ्यासाठी प्रिय आहे. कोणाच्याही आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही. एक-एक आयुष्य वाचणं यावेळी माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मी केवळ माझं कर्तव्य केलंय असेही तो म्हणाला. 


कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे. तुमचं छोट्यातलं छोटं दान आम्ही स्वीकारू, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. मोदींच्या या आवाहानाला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एका तासाच्या आत प्रतिसाद दिला. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतचं एक ट्विट अक्षय कुमारने केलं आहे. 



अक्षय कुमार याच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये आणि प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये दिले आहेत.



भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १६७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जनतेने येत्या काही दिवसात घराबाहेर पडू नये, असं आवाहन सगळेच करत आहेत.