मुंबई : नशीब आणि मेहनतीची खेळी कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं पुरतं आयुष्य बदलते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता रजनीकांत. हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वात नावारुपास आलेल्या आणि प्रत्येक चित्रपटातून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या सुपरस्टारचा आज वाढदिवस. 'थलैवा' म्हणा किंवा आणखी काही, रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला शब्दांत व्यक्त करणं निव्वळ अशक्यच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी कलाविश्वासोबतच दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत रजनीकांत यांना चाहत्यांनी देवत्व बहाल केलं आहे. पण, या टप्प्यावर पोहोचण्याची त्यांची वाट काही सोपी नव्हती. यासाठीही त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. शिवाजीराव गायकवाड असं रजनीकांत यांचं खरं नाव. एकेकाळी बस कंडक्टरचं काम करणारे हेच रजनीकांत सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. 


माध्यमांमध्ये असणाऱ्या चर्चांनुसार असं कळत आहे, की ब्लॉकबस्टर 'कबाली' या चित्रपटासाठी त्यांनी ४० ते ६० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. तर, खिलाडी कुमारसोबतच्या '२.०' या मागील वर्षीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठीही त्यांनी घसघशीत मानधन आकारल्याचं सांगण्यात येतं. अंदाजे मानधनाचा हा आकडा ८० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. मानधनाच्या बाबतीतही रजनीकांत थलैवा आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 



१९७५मधील 'अपूर्व रागंगल' या चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ज्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या. चित्रपट कारकिर्दीत फक्त मानधनाच्या बाबतीत नव्हे, तर पुरस्कार आणि समाजात असणाऱ्या स्थानाविषयीही रजनीकांत यांची इतर कलाकारांच्या तुलनेत सरशी दिसते. त्यांना भारत शासनाकडून देण्यात येणाऱ्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.


दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती ठरली Miss Universe 2019



कलाविश्वात अतिशय स्थिर आणि तितकीच गौरवशाली अशी कारकिर्द भूषवणारा हा अभिनेता आता राजकारणाच्या वर्तुळातही त्याचं नशीब आजमावण्याच्या मार्गावर आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजकीय पक्षाची स्थापनाही केली. तेव्हा आता, राजकीय पटलावरील त्यांनी नवी इनिंग कशी असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.