नागपूर : मुंबईत रविवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या बातमीने बॉलिवूडवक शोककळा पसरली. अभिनेता सुशांतने आत्महत्या का केली हे अजून समोर आलेलं नाही. पण पोलीस याचा तपास करत आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, 'सुशांतची आत्महत्या ही दुर्देवी आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्या काही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, काही वेगळं असेल तर त्या अँगलनेसुद्धा पोलीस तपास करतील.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतच्या आत्महत्येनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागे कट असल्याचं वक्तव्य त्याचा चुलत भाऊ आमदार नीरज बबलू यांनी केलं आहे. ते म्हणाले की, 'जो व्यक्ती इतरांचा आत्मविश्वास वाढवायचा तो असं काही करू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याच्या आत्महत्येमागे कट आहे की नाही हे त्याठिकाणी गेल्यावरच कळेल. सुशांतचा एक मेहुणा पोलीस अधिकारी आहे. ते या प्रकरणाची तपासणी करत आहेत.' असं देखील निरज बबलू यांनी म्हटलं आहे.


मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूचे गूढ सोडविण्यात गुंतले आहेत. पोलिसांनी सुशांतच्या बहिणीशी या संदर्भात चौकशी केली. ज्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. बहिणीने पोलिसांना सांगितले की, सुशांतला आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण नव्हती. आर्थिकदृष्ट्या सर्व काही ठीक होते. पण गेल्या आठवड्यापासून सुशांतची प्रकृती ठीक नव्हती.


बहिणीने सांगितले की, ती सुशांतला त्याच्या वांद्रे फ्लॅटवरही भेटायला गेली होती. सुशांतच्या नैराश्याबद्दल तिला माहिती असल्याचेही तिने उघड केले. पण सुशांत इतके मोठे आणि भयानक पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सुशांत अत्यंत सामान्यपणे बोलायचा. सुशांत सिंह राजपूत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होता. तो क्लिनिकल डिप्रेशनचा बळी होता. मात्र, पोलिसांना अद्याप याची खातरजमा करायची आहे.