मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतून एकापाठोपाठ दोन कलाकारांच असं जाणं चटका लावणारं आहे. गेल्या २४ तासांत दोन उत्कृष्ठ अभिनेत्यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. २९ एप्रिल रोजी अभिनेता इरफान खान आणि ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांच निधन झालं. संपूर्ण देशाला या दोन्ही घटनांनी खूप मोठा धक्का बसला. ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता ऋषी कपूर यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले. तेव्हा असं वाटलं आता ऋषी कपूर पुन्हा कमबॅक करतील. एवढंच नव्हे तर त्यांची अर्धवट राहिलेली इच्छा देखील पूर्ण होईल. पण तसं काहीच झालं नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर आणि नितू कपूर यांना दोन मुलं रिद्धिमा आणि रणबीर कपूर. रिद्धिमाचं भरत सहानीसोबत लग्न झालं असून ती दिल्लीत राहते. ऋषी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या अभिनेत्री आलियाला डेट करत आहे. ऋषी कपूर यांची खूप इच्छा होती की रणबीर कपूरचं लग्न पाहावं. अनेकदा या दोघांच्या लग्नाची चर्चा देखील झाली. 'ब्रम्हास्त्र' सिनेमामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली. त्यानंतर कोरोनाचं संकट आलं. 



या दरम्यान अनेकदा ऋषी कपूर यांनी होणारी सून आलिया भट्ट हिची भेट घेतली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकदा हे सगळे डिनरला एकत्र भेटल्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ऋषी कपूर यांनी अनेकदा मुलाखतीतही बोलून दाखवलं की, त्यांना आपल्या मुलाचं लग्न पाहायचं आहे. 



पण त्यांच्या अकाली जाण्याने ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली. मुलगा रणबीर आणि भावी सून आलिया यांच लग्न त्यांना पाहता आलं नाही.  ही खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.