बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'खलनायक' (Khalnayak) चित्रपटाने 30 वर्षं पूर्ण केली आहेत. दरम्यान यानिमित्ताने मुक्ता सिनेमाच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मुंबईत या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. या प्रिमिअरसाठी दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अलका यागनिक आणि इला अरुण यांनी हजेरी लावली. पण या प्रिमिअर नाईटला माधुरी दीक्षित मात्र गैरहजर होती. चाहत्यांच्या नजरा माधुरी दीक्षितला शोधत होत्या. दरम्यान, यावेळी सुभाष घई यांनी माधुरी आणि संजय दत्त यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. हा किस्सा त्यांच्या लव्हस्टोरीशी जोडलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलनायकच्या प्रिमिअर नाईटला सुभाष घई यांना हा चित्रपट हिट होईल असा विश्वास होता का? असं विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना सुभाष घई यांनी सांगितलं की "मला नेहमीच आत्मविश्वास होता. पण दिग्दर्शक या नात्याने मनात थोडीशी भीती असते. पण संजय दत्तला या चित्रपटाबद्दल माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास होता". नंतर संजय दत्तला टोला लगावत ते म्हणाले "हा बोलायचा चित्रपट फार दूरपर्यंत जाईल. पण पाहायचा माधुरी दीक्षितकडे".


संजय दत्तची अशी होती प्रतिक्रिया


सुभाष घई यांचं हे विधान ऐकल्यानंतर संजय दत्तला थोडा आश्चर्याचा धक्का बसला होता. पण नंतर मात्र तो हसू लागला. यावेळी त्याने काही भाष्य करणंही टाळलं. 


बॉलिवूडमध्ये एकेकाळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यामधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. ज्यामध्ये साजन, खलनायक अशा चित्रपटांचा समावेश होता. पण नंतर दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. असं म्हणतात की, दोघंही जवळपास लग्न करण्यापर्यंत पोहोचले होते. पण बॉम्बब्लास्टमध्ये संजय दत्तचं नाव आलं आणि दोघे कायमचे दुरावले. तसंच दोघांच्या अफेअरची माहिती मिळाल्यानंतर संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा कँन्सर उपचार सोडून विदेशातून भारतात आली होती. 


सुभाष घईंनी काढली सरोज खान यांची आठवण


या कार्यक्रमात सुभाष घई यांनी चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले. त्यांनी चित्रपटासाठी काम करणारे सर्व तंत्रज्ञ यांना धन्यवाद म्हटलं. तसंच संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यापासून ते गीतकार आनंद बख्शी यांचेही आभार मानले. याशिवाय त्यांनी दिवंगत नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांची आठवण काढली. सरोज खान यांनीच प्रसिद्ध 'चोली के पीछे' गाणं कोरिआग्राफ केलं होतं.