मुंबई : अमृतमंथनातून निर्माण झालेली आरोग्यशास्त्राची देवता म्हणजे ‘धन्वंतरी’ !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल आपण आजारी पडलो की डॉक्टरांचा धावा करतो. पण आयुर्वेदाचा आणि आरोग्यरक्षणाचा अधिपती धन्वंतरी यांच्या मते, आजारी पडूच नये म्हणून आपण दक्ष  राहणे हे गरजेचे आहे. स्वास्थ्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात सुचवलेल्या मार्गानुसार आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मग जाणून घ्या धन्वंतरी देवतेच्या हातात असलेल्या चार शस्त्रांचे स्वास्थ्य सुधारक चार संकेत आहेत त्याची माहिती शीव आयुर्वेदीक महाविद्यालय-सायन येथील प्रोफेसर आणि वैद्य डॉ. रजनी पाटणकर यांनी दिला आहे. 



# 1 चक्र  – 
मनातील आणि शरीरातील विषारी घटकांच्या संहाराचे प्रतिक म्हणजे ‘चक्र’ ! शरीरात विषारी घटकांचा प्रादूर्भाव वाढल्यास आपल्या आरोग्यात बिघाड होण्यास सुरवात होते. म्हणूनच धन्वंतरीच्या हातातील चक्र ‘आयुर्वेदा’च्या  शस्त्रारूपी सहाय्याने मानवी शरीरातील दोष  कमी करण्यास मदत करतात. 
#2 शंख – 
प्राचीन काळापासून शुभ कार्याची सुरवात ‘ शंख नादाने’ केली जाते. शंख ध्वनीच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक उर्जा  पसरवण्यास मदत होते. तसेच हवेतील प्रदूषण आणि विषाणू कमी करण्यास शंखनाद फायदेशीर ठरतो. वातावरण प्रसन्न झाले की आपोआपच मनाची चंचलता कमी होते, मानसिक ताण हलका होतो परिणामी आरोग्य सुधारण्यास मदत होते.
# 3 जळू (जलौका)  – 
रक्त हे जीवधारक आहे. मानवी शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी रक्त शुद्ध आणि प्रवाही रहाणे आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार जळू हे रक्ताशुद्धीसाठी फायदेशीर आहे. जळूचा त्वचेला स्पर्श झाल्यास शरीरातील अशुद्ध रक्त शोषले जाते. रक्तदाब वाढल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी जळू लावला जातो. 
#4  अमृत कलश –  
अमृताचा कलश हा रामबाण आयुर्वेदीक औषधांचा भांडार समजला जातो. बदलत्या काळानुसार औषधशास्त्रात अनेक बदल झालेत. पण आयुर्वेदात अनेक आजारांवर मात करण्याची तसेच प्रतिबंध करण्याची क्षमता असल्याने ‘आयुर्वेद’ या अमृतारुपी घडाचा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच वापर करा.