मुंबई : नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते. भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी  साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच  भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते. मग तज्ञांकडून जाणून घ्या या भाजीचे आरोग्यदायी महत्त्व. 


 


भोगीची भाजी – 


भोगीची भाजी ही वांगं, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे घालून केली जाते.  वांग हे वातूड असल्याने त्याचा वापर टाळावा असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. पण आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या दिवसात  वांग्याचे भरीत खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास तसेच कफ कमी करण्यास मदत होते. तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात. 
 यासोबत  दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला  उब मिळावी व थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.  


 
 कशी कराल भाजी –



कढईत तेल गरम करून राई, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी घाला. यामध्ये शेंगदाणे, हरभरे आणि घेवडा घालून वाफ काढावी. 
नंतर वांगं आणि गाजर घालावे. थोडे पाणी घालून कढईवर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर भाजी शिजू द्या.


 दरम्यान भाज्या शिजताना चिंचेचा कोळ घालावा.  भाज्या शिजल्यानंतर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे.  आवश्यकतेनुसार चव पाहून मीठ घाला. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर  भाकरीबरोबर गरमागरम भाजीचा आस्वाद घ्या. 


भोगीच्या भाजी सोबत बाजरीची भाकरी का ?  


बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे.  बाजरीपासून दिवे, उंडे, खिचडी, चकोल्या बनविल्या जातात. ज्या बलवर्धक असतात. बाजरी ही बलकारक, उष्ण , अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे  भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. त्यापीठात देखील तीळ मिसळावेत.