तिरुवनंतपुरम : केरळमधली पूरस्थिती आता काहीशी सुधारली आहे. पण पाणी उतरल्यानं आता त्यामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानीचं भीषण वास्तवही आता समोर आलं आहे. ११ हजार गावं उद्धवस्त झाली आहेत. २६ लाख घरांना अजूनही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. ४६ हजार हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. काल दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या सहा दिवसातील मृतांचा आकडा २५२वर पोहचला आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे साडे चारशे जणांनी पावसामुळे प्राण गमावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात आलेला पूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या पुरात सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेंच नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे सुमारे १० हजार किलोमीटरचे रस्ते आणि सुमारे २०० पूल जमीनदोस्त झाले आहेत. ७ लाखांहून अधिक लोकं बेघर आहेत. अजूनही अनेक गावं संपर्कहिन आहेत.