अहमदाबाद : गुजरातच्या जामनगर न्यायालयानं निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या दोषी सहकारी अधिकारी प्रवीण सिंह याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय. ३० वर्षांपूर्वी पोलिसांच्या अटकेत असलेल्या एकाच्या हत्या प्रकरणात संजीव भट्ट दोषी ठरलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९० मध्ये जामनगरमध्ये भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसेदरम्यान भट्ट हे जामनगरचे एएसपी होते. हिंसेदरम्यान पोलिसांनी १०० जणांना अटक केली होती. यातील प्रभुदास माधवजी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. प्रभुदास यांचा भाऊ अमृत वैष्णवी यांनी संजीव भट्ट यांच्याविरुद्ध खटला दाखल करून अटके दरम्यान छळ केल्याचा आरोप केला. 



भट्ट यांनी २००२ मध्ये गुजरात दंग्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र मोदींविरोधात शपथपत्र दाखल केल्यानंतर भट्ट चर्चेत आले होते. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंग्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समिती (एसआयटी) आपला विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दीर्घकाळ कामावर अनुपस्थित राहिल्यानं २०१५ मध्ये गुजरात सरकारनं निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना निलंबित केलं होतं. 


संजीव भट्ट हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आयआयटी मुंबईतून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर संजीव भट्ट १९८८ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले होते.