मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत (agneepath scheme) प्रथम भारतीय हवाई दलात भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय हवाई दलाने घोषणा केली आहे. (Recruitment In Indian Air Force)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील अनेक राज्यांमध्ये अग्निपथ योजनेला युवक विरोध करत आहेत. बिहार, मध्य प्रदेशपासून ते दिल्ली, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगालपर्यंत युवकांची निदर्शनं सुरु आहेत. भारतीय वायुदलात सर्वाधिक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी घोषणा केली होती की भारतीय हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल.


गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, अग्निवीर योजनेंतर्गत 4 वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे अग्निपथ योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेले तरुण यापुढेही देशाच्या सेवेत आणि सुरक्षेत योगदान देऊ शकतील.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अग्निपथ योजना तरुणांच्या हिताची असून त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे सांगितले होते. तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही सैन्यात भरतीच्या या नव्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.


अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक राज्यांत निदर्शने झाली. यापैकी अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. येथे एका ट्रेनला आग लावण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात तोडफोडही झाली. आंदोलनादरम्यान एकूण 17 राउंड गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.