नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. अशावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोध पक्षाची आपापली स्थिती मजबूत करण्यासाठी धावपळ उडालीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एनडीएतील सर्व घटकांना मोदी सरकारच्या बाजुनं मतदान करण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत. अशावेळी अनेकांचं लक्ष लागून राहिलंय ते 'शिवसेने'कडे... भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधलाय, अशी माहिती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलेलं आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतंच चाललंय, हे सर्वश्रुत आहेच... फेरनिवडणुकीत तर हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्धच रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले होते... आणि या फेरनिवडणुकीत भाजपनं बाजी मारली. याची सलही शिवसेनेला लागून आहे. अशावेळी शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 


सूत्रांच्या माहितीनुसार, अविश्वास प्रस्तावच्या गोंधळात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी फोन केला. शिवसेनेनं सरकार सोबत राहवं अशी विनंती अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचीही माहिती पुढे आली आहे. 


यावर उद्धव ठाकरेंनी आपण सरकारसोबतच राहणार असल्याचं आश्वासन शाह यांना दिलंय... शिवसेना हा एनडीएचा भाग आहे आणि अविश्वास प्रस्तावादरम्यान आपण मोदी सरकारसोबतच राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय. 



न्यूज एजन्सी, एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेनं आपल्या खासदारांसाठी एक व्हिप जारी केलाय. यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूनचं मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. 


एनडीएचे लोकसभेत ३१० खासदार आहेत. लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या १८ आहे. मोदी सरकारविरोधातील हा ठराव मांडला असला तरी संख्याबळ असल्याने त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण विरोधी पक्ष या निमित्तान एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.